मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम शिगेला असताना राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. आगामी २ डिसेंबरला होणाऱ्या मतदानापूर्वी प्रचारासाठीची वेळ वाढवण्यात आली असून, आता उमेदवारांना १ डिसेंबरच्या रात्री १० वाजेपर्यंत प्रचार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आयोगाच्या या नव्या आदेशामुळे मतदानाच्या आधीच्या अंतिम दिवशी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांना अधिक अवधी मिळणार आहे.
आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, यापूर्वी मतदानाच्या दिवसापूर्वीच्या २४ तासांपासून सर्व प्रकारचे प्रचारकार्य पूर्णतः बंद राहायचे. यात सभा, जाहीर मोर्चे, ध्वनिक्षेपकांचा वापर, तसेच वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावरील निवडणूक जाहिरातींवरही प्रतिबंध होता. या मर्यादा उमेदवारांसाठी विशेषतः शेवटच्या क्षणी प्रचाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरत होत्या. अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप उशिराने करण्यात आले. त्यामुळे प्रचाराला अवधी मिळालाच नसल्याची तक्रार करण्यात आली होती. अखेर निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. निवडणूक आयोगाने नियमांमध्ये सशर्त शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. १ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत प्रचार परवानगी मिळाल्याने उमेदवारांना अंतिम दिवशी सभा, पदयात्रा, घर-दार संपर्क मोहिमा आणि सोशल मीडियाद्वारे आपला संदेश पोहोचवण्याची अतिरिक्त संधी उपलब्ध झाली आहे.

