कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरातील वाढती वाहतूक कोंडी आणि उपनगरी रेल्वेवरील प्रचंड गर्दी लक्षात घेता जलवाहतुकीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेगाने आकार घेत आहे. डोंबिवली, ठाणे, मीरा-भाईंदर, वसई तसेच दुसऱ्या मार्गाने डोंबिवली, दिवा ते नवी मुंबई विमानतळ अशा दोन जलमार्गांची आखणी करण्यात आली असून त्यासाठी डोंबिवलीतील मोठागाव येथे उभारण्यात येणाऱ्या जेट्टीचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. ठाण्यापुढील स्थानकांमधून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी मुंबईकडे प्रवास करतात. मात्र अपुऱ्या लोकल फेऱ्या आणि वाढत्या गर्दीमुळे अनेकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. या समस्येवर पर्याय म्हणून जलवाहतूक सेवा सुरू करण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मेरीटाइम मंत्री असताना या प्रकल्पाला चालना दिली होती, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वॉटर टॅक्सी हा जलद आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय ठरणार असल्याचे स्पष्ट केले होते.
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमातील महत्त्वाचा भाग असलेल्या या प्रकल्पामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास स्थानिक लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला आहे. पहिल्या टप्प्यात डोंबिवली ते ठाणे गायमुख दरम्यान जलप्रवास सेवा सुरू करण्याची तयारी सुरू असून लवकरच प्रकल्पाची पाहणी होणार आहे. मंत्री नितेश राणे आणि रवींद्र चव्हाण स्वतः या प्रकल्पावर लक्ष ठेवून आहेत. प्रस्तावित ई-वॉटर टॅक्सी सेवा डोंबिवलीहून सुरू होऊन ठाणे, मीरा-भाईंदर, वसई या मार्गावर धावणार आहे. तसेच दुसऱ्या मार्गाने डोंबिवली, दिवा, ठाणे मार्गे थेट नवी मुंबई विमानतळाशी जोडणी केली जाणार आहे. प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर आवश्यक सुरक्षा चाचण्या पार पाडून ही सेवा प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहे. मात्र तिकीट दरांबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
