मुंबई : सागरी उत्पादनाला आणि निर्यातीला चालना दिल्यामुळे देशातून आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये आजवरची उच्चांकी सागरी खाद्य उत्पादनांची निर्यात झाली आहे. मासे, कोळंबीसह अन्य खाद्यपदार्थांची निर्यात ६२,४०८ कोटी रुपयांवर गेली आहे. अमेरिकेने आयात शुल्कात वाढ केल्यानंतरही कोळंबीच्या निर्यातीत सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.
केंद्रीय मत्स्य पालन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मत्स्य किसान समृद्धी योजनेसारख्या विविध योजनांमुळे सागरी खाद्य पदार्थ उत्पादनांत आणि निर्यातीत भरीव वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२४ – २५ मध्ये देशातून ६२,४०८ कोटी रुपये किंमतीच्या सागरी उत्पादनांची निर्यात झाली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ६०,५२३ कोटी रुपयांची निर्यात झाली होती. एप्रिल २०२५ पासून अमेरिकेने सागरी खाद्य पदार्थांच्या आयातीवर मोठा कर लागू केला. त्यामुळे भारतातून आयात होणाऱ्या कोळंबीवरील कर ५८.२६ टक्के झाला. देशातून होणाऱ्या सागरी खाद्य पदार्थांच्या निर्यातीत कोळंबीचा वाटा ९० टक्के होता. त्यानंतरही निर्यातीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आयात शुल्कात वाढ केल्यानंतरही निर्यातीत किंमतीचा विचार करता २१ टक्के म्हणजे ३५,१०७ कोटी रुपयांनी तर वजनाच्या दृष्टीने १२ टक्के म्हणजे १० लाख टनांनी वाढ झाली आहे. कोळंबीच्या निर्यातीत सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.

