विरार : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विशेष बससेवा सुरू केली आहे. मुंबई महानगर क्षेत्रातून यंदा कोकणासाठी ५ हजारांहून अधिक विशेष बसेस सोडण्यात आल्या असून, वसई, नालासोपारा आणि अर्नाळा या तीन आगारांतून एकूण ५८४ बस रवाना करण्यात आल्या आहेत. एसटीच्या समूह नोंदणी सुविधेला प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून हजारो कोकणवासीयांना याचा लाभ झाला आहे. मात्र, या विशेष बसांसाठी शहरांतर्गत मार्गांवरील अनेक बस वळवण्यात आल्याने वसई-विरार परिसरातील नियमित बससेवेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे शहरांतर्गत धावणाऱ्या एसटी बसेस अर्धा ते पाऊण तास उशिराने येत असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
वसई-विरार परिसरातील औद्योगिक भाग, भिवंडी, ग्रामीण क्षेत्र तसेच विविध शैक्षणिक संस्थांकडे जाणारे हजारो नोकरदार, विद्यार्थी आणि नागरिक दररोज एसटी बसवर अवलंबून असतात. नवघर, वसई गाव, नालासोपारा आणि अर्नाळा आगारातून सुटणाऱ्या बसांच्या फेऱ्यांमध्ये उशीर होत असल्याने सकाळच्या वेळेत बसस्थानकांवर मोठी गर्दी होत आहे. अनेकांना कार्यालयात आणि महाविद्यालयात वेळेवर पोहोचणे कठीण जात असून प्रवाशांचा प्रवास विस्कळीत झाला आहे. गणेशोत्सवाच्या सुट्ट्यांमुळे स्थानिक नागरिक गणपती दर्शनासाठी आणि नातेवाईकांकडे जाण्यासाठीही एसटीचा वापर करत आहेत. मात्र, बससेवेतील विलंबामुळे त्यांच्या नियोजनावरही परिणाम होत आहे. कोकणातील विशेष बससेवा आणि शहरांतर्गत नियमित वाहतूक यामध्ये समतोल राखण्यासाठी अतिरिक्त बस उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. गणेशोत्सवाच्या काळात वाढलेल्या प्रवासी संख्येचा विचार करून शहरांतर्गत बससेवा पूर्ववत करण्यासाठी एसटी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
