ठाणे : शेतकऱ्यांना रासायनिक खतांची उपलब्धता घरबसल्या मोबाईलवर तपासता यावी आणि खत खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांच्या वारंवार फेऱ्या टाळता याव्यात, यासाठी ठाणे जिल्ह्यात १५ ऑगस्ट २०२६ पासून ‘Framework for Fertilizer Sale’ ही ऑनलाइन खत विक्री प्रणाली सुरू करण्यात येणार आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना युरिया, डीएपी यांसारख्या अनुदानित खतांचा उपलब्ध साठा पाहता येणार असून, आवश्यकतेनुसार ऑनलाइन बुकिंग करून जवळच्या उपलब्ध विक्रेत्याची निवड करता येणार आहे. छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील यशस्वी प्रयोगानंतर ठाण्यासह पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, लातूर, वाशिम आणि गडचिरोली या जिल्ह्यांत ही सुविधा सुरू केली जात आहे. ठाणे जिल्ह्यात सुमारे १ लाख ३८ हजार ८६२ शेतकरी असून खरीप हंगामाचे सुमारे ५९ हजार ८३१ हेक्टर क्षेत्र आहे. आतापर्यंत सुमारे ८५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, जिल्ह्यात सध्या सुमारे १ हजार ६११ मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्याला दरवर्षी सुमारे १० ते ११ हजार मेट्रिक टन खताची आवश्यकता असते. युरियाला मोठी मागणी असल्याने त्याचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यासाठी कृषी विभागाकडून नियोजन करण्यात येत आहे. या नव्या प्रणालीमध्ये शेतकऱ्यांना आधार क्रमांक किंवा Farmer ID च्या माध्यमातून नोंदणी करता येणार आहे. मोबाईलवर राज्याची निवड करून आधार क्रमांक व OTP द्वारे पडताळणी केल्यानंतर स्वतःची, भाडेकरू किंवा संयुक्त मालकीची जमीन निवडता येईल. त्यासाठी जिल्हा, तालुका, गाव आणि सर्व्हे किंवा गट क्रमांकाची माहिती भरून जमिनीची नोंद प्राप्त करता येईल. त्यानंतर संबंधित हंगाम आणि लागवड केलेले पीक निवडल्यानंतर शासनाच्या GFRनुसार शिफारस केलेल्या खतांची यादी आणि आवश्यक प्रमाण अॅपवर दिसणार आहे. शेतकऱ्याला आवश्यक खताच्या बॅगांची संख्या निवडून जवळील उपलब्ध विक्रेत्याची निवड करता येईल. उपलब्ध साठा आणि विक्रेत्याचे अंतर यानुसार योग्य पर्याय निवडता येणार असल्याने खत खरेदी प्रक्रिया अधिक नियोजनबद्ध होण्यास मदत होणार आहे.
ऑनलाइन अर्ज यशस्वीरीत्या सादर केल्यानंतर शेतकऱ्याला QR Code आणि Token Number मिळणार आहे. खत स्वतः घेणार असल्यास स्वतःचा पर्याय निवडता येईल, तर प्रतिनिधीमार्फत खत घेणार असल्यास संबंधित प्रतिनिधीची माहिती व आधार क्रमांकाची पडताळणी करावी लागणार आहे. त्यानंतर निवडलेल्या खत विक्रेत्याकडे जाऊन QR Code दाखविल्यानंतर विक्रेत्याकडून तो स्कॅन केला जाईल. अर्जातील माहिती आणि खताचे निर्धारित प्रमाण तपासल्यानंतर व्यवहार पूर्ण करून शेतकऱ्याला खत देण्यात येईल. खत घेतल्यानंतर पावती घेणे आवश्यक राहणार आहे. या प्रणालीमुळे खत उपलब्ध आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रांवर वारंवार जाण्याची गरज कमी होणार असून, त्यांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचणार आहे. तसेच खताची उपलब्धता, बुकिंग आणि वितरण यामध्ये अधिक पारदर्शकता येण्याची अपेक्षा आहे. प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी ठाणे जिल्हा कृषी विभागाने तयारी सुरू केली असून, जिल्हास्तरीय मास्टर ट्रेनरच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी आणि कृषी निविष्ठा विक्रेत्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. QR Code आधारित खत विक्रीची कार्यपद्धतीही संबंधितांना समजावून सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांना प्रणालीचा सहज वापर करता यावा यासाठी जनजागृती आणि प्रचार-प्रसिद्धी करण्यात येत आहे. खत खरेदीसाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक असून जमिनीची माहिती अद्ययावत असणे गरजेचे आहे. GFRनुसार शिफारस केलेल्या खताची माहिती तपासूनच खताची निवड करावी आणि ऑनलाइन बुकिंगनंतर मिळालेला QR Code सुरक्षित ठेवावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. चुकीची किंवा अपूर्ण माहिती भरल्यास प्रक्रियेत विलंब होऊ शकतो. खताची खरेदी केवळ नोंदणीकृत विक्रेत्याकडूनच करावी, अशीही सूचना देण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज, खताची उपलब्धता, बुकिंग किंवा वितरणासंदर्भात अडचण आल्यास संबंधित तालुका कृषी अधिकारी, गुणनियंत्रण निरीक्षक, पंचायत समितीतील कृषी अधिकारी किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधता येणार आहे. कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे, मुनिर बाचोटीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मोबाईलवरून खताची उपलब्धता तपासून गरजेनुसार विक्रेता निवडता येईल आणि QR Codeच्या माध्यमातून खत मिळवता येणार असल्याने संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक होण्यास मदत होईल. ठाणे जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या डिजिटल सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद कृषी विभागाने केले आहे.

