पालघर : ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना विविध व्यवसाय, करिअरच्या संधी आणि शिक्षणाविषयी प्रेरणा मिळावी या उद्देशाने पालघर जिल्हा परिषदेकडून सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने ‘कहानी–कला–खुशी’ हा अभिनव शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहे. खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध करिअर क्षेत्रांची माहिती देणाऱ्या या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळत असून, पालघर तालुक्यातील सुमारे ३ हजार विद्यार्थ्यांपर्यंत या उपक्रमाचे साहित्य पोहोचविण्यात आले आहे. या उपक्रमाची व्याप्ती जिल्हाभर वाढविण्याची गरज असल्याचे मत जिल्हा परिषद प्रशासनाने व्यक्त केले आहे. आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये विविध सामाजिक व सेवाभावी संस्थांच्या मदतीने जिल्हा परिषद अनेक उपक्रम राबवत आहे. विशेषतः ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे, शाळांमधील भौतिक सुविधा सुधारणा करणे आणि आवश्यकतेनुसार मनुष्यबळ उपलब्ध करून देणे या उद्देशाने अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. पालघर तालुक्यात रिलायन्स फाउंडेशनच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी दिली. ‘कहानी–कला–खुशी’ या खेळामध्ये प्रत्येक संचात ५० माहितीपूर्ण पत्ते असून, प्रत्येक पत्त्यावर एखाद्या व्यवसायाचे चित्र आणि त्याची माहिती दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी काही पत्ते हातात घेऊन त्यावरील व्यवसायाबाबत खुणा किंवा संकेत देत इतर विद्यार्थ्यांना तो व्यवसाय ओळखण्यास प्रवृत्त करायचे असते. ‘ओळखा पाहू हा व्यवसाय’ या संकल्पनेवर आधारित हा खेळ इयत्ता पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आला असून, त्यातून डॉक्टर, अभियंता, शिक्षक, शास्त्रज्ञ, कलाकार, कृषी तज्ज्ञ, उद्योजक अशा विविध क्षेत्रांची सहज आणि मनोरंजक पद्धतीने माहिती मिळते. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच विविध करिअरविषयी जागरूकता निर्माण होत असून, भविष्यात विशिष्ट क्षेत्रात करिअर घडविण्याची प्रेरणा आणि अभ्यासाची आवडही वाढत असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने सांगितले आहे.
शैक्षणिक उपक्रमांसोबतच पालघर जिल्ह्यातील शाळा आणि अंगणवाड्यांच्या पायाभूत सुविधांमध्येही मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात येत आहे. रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून कमारे, वाकसई, मायखोप आणि देवीपाडा (केळवे) येथील अंगणवाड्यांची दुरुस्ती, रंगरंगोटी आणि बालस्नेही वातावरणाची निर्मिती करण्यात आली आहे. गळणाऱ्या छतांची दुरुस्ती करून सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, अंगणवाड्यांमध्ये परसबाग उभारण्यात आली आहे. स्थानिक पालकांना उपलब्ध संसाधनांमधून पौष्टिक आहार तयार करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले असून, आरोग्य विभागाच्या समन्वयाने गरोदर महिलांना प्रोटीन किटचे वितरण करण्यात आले आहे. याशिवाय केळवे रोड, कमारे आणि वरखुंटी येथील जिल्हा परिषद शाळांना इंटरॲक्टिव्ह पॅनल बोर्ड आणि आधुनिक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. दहा शाळांना क्रीडा साहित्य देण्यात आले असून, वीस शाळांमधील पाणी शुद्धीकरण यंत्रांची दुरुस्तीही करण्यात आली आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी ‘ज्ञानग्राम’ या उपक्रमाअंतर्गत वाकसई परिसरातील समाजमंदिरात विद्यार्थ्यांसाठी गणित, इंग्रजी आणि विज्ञान विषयांचे विशेष मार्गदर्शन वर्ग नियमितपणे घेतले जात आहेत. या वर्गांमध्ये कठीण संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून सांगितल्या जात असून, विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठीही प्रोत्साहन दिले जाते. या उपक्रमाला विद्यार्थी आणि पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने, अशाच प्रकारचे विशेष वर्ग जिल्ह्यातील इतर ग्रामीण भागातही सुरू करण्याचा मानस जिल्हा परिषदेने व्यक्त केला आहे. शिक्षणासोबतच करिअर मार्गदर्शन, आधुनिक सुविधा आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन यांचा समन्वय साधत पालघर जिल्हा परिषद विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे या उपक्रमांतून स्पष्ट होत आहे.

