नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती)ने प्रशासकीय सेवांच्या क्षेत्रात आणखी एक उल्लेखनीय यश नोंदवले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF) सहाय्यक कमांडंट परीक्षा २०२५ च्या अंतिम निकालात महाज्योतीच्या प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ घेतलेल्या ११ विद्यार्थ्यांची असिस्टंट कमांडेंट पदासाठी निवड झाली आहे. या यशामुळे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना घडविणारी संस्था म्हणून महाज्योतीने आपला ठसा अधिक मजबूत केला आहे. यूपीएससीने ३५० सहाय्यक कमांडंट पदांसाठी घेतलेल्या परीक्षेत महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. अंतिम गुणवत्ता यादीत ऋषीप्रसाद सुहास देवरे (२० वा क्रमांक), इंद्रजित महेश खाडे (३०), प्रणित सुधाकर फटंगरे (३६), विनायक अजय नागरिया (४०), प्रतिक गणेश जेव्हारे (५७), पल्लवी बाळासाहेब अहेर (९५), प्रज्वल राजकुमार शिंदे (९७), विश्वास अजयकुमार झरगाड (१४५), गौरव गुरुनाथ म्हात्रे (१७२), सुदर्शन नारायण नेहारकर (२३९) आणि पांडुरंग बाबुराव फोंडे (२५२) यांनी स्थान मिळवले. हे सर्व विद्यार्थी आता केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात असिस्टंट कमांडेंट म्हणून देशसेवेची जबाबदारी सांभाळणार आहेत.
महाज्योतीच्या व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे यांनी सांगितले की, या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा आणि मुलाखतीसाठी आर्थिक सहाय्याबरोबरच अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, सराव मुलाखती, अद्ययावत अभ्यास साहित्य आणि नियोजनबद्ध प्रशिक्षण देण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबतच गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण प्रणालीमुळे हे यश शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. महाज्योती विशेषतः ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील आणि सर्वसामान्य कष्टकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम करण्याचे काम करत आहे. योग्य मार्गदर्शन आणि आर्थिक पाठबळ मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीही सर्वोच्च प्रशासकीय सेवांमध्ये यश मिळवू शकतात, याचा प्रत्यय या निकालातून पुन्हा एकदा आला आहे. त्यामुळे सामाजिक न्याय आणि समान संधीच्या दिशेने महाज्योतीचे कार्य महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा महाज्योतीचे अध्यक्ष अतुल सावे यांनी या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. बहुजन समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण, योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक संधी उपलब्ध करून देण्याचे महाज्योतीचे ध्येय यामुळे अधिक बळकट झाले आहे, असे त्यांनी नमूद केले. अतुल सावे म्हणाले की, प्रशासकीय सेवांमध्ये बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी महाज्योती सातत्याने प्रयत्नशील आहे. केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात ११ विद्यार्थ्यांची निवड ही संस्थेच्या कार्यपद्धतीला मिळालेली मोठी दाद असून, भविष्यातही अशाच प्रकारे अधिकाधिक अधिकारी घडविण्याचा महाज्योतीचा संकल्प कायम राहील. महाज्योतीच्या या यशामुळे राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली आहे. योग्य दिशा, सातत्यपूर्ण अभ्यास, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि संस्थात्मक पाठबळ यांच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावरील कठीण परीक्षांमध्येही यश संपादन करता येते, हे या निकालाने सिद्ध केले आहे. प्रशासकीय सेवेत प्रवेश करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी महाज्योतीचे हे यश प्रेरणादायी ठरत असून, आगामी काळातही संस्था अशाच प्रकारे गुणवंत विद्यार्थ्यांना घडवत राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

