ठाणे : महाराष्ट्रात व्यवसाय किंवा रोजगार करायचा असेल, तर मराठी भाषेचं किमान व्यवहारिक ज्ञान असणं आवश्यक असून, १५ ऑगस्टनंतरही मराठी बोलता न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला. महाराष्ट्र दिनानिमित्त १ मेपासून सुरू झालेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियाना’चा समारोप १७ ऑगस्ट रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या हजारो अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांना यावेळी व्यवहारिक मराठीचे प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती सरनाईक यांनी ९ ऑगस्ट रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. राज्यभर राबविण्यात आलेल्या १०० दिवसांच्या विशेष अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत एक लाखांहून अधिक अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांनी व्यवहारिक मराठीचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. उर्वरित चालकांनीही १५ ऑगस्टपूर्वी प्रशिक्षण पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्रात काम करताना मराठीशी नाळ जोडणं आवश्यक असल्याचं सांगत त्यांनी मराठी ही सक्तीची नव्हे, तर आपुलकीची भाषा असल्याचं नमूद केलं. प्रवाशांशी मराठीत संवाद साधणारा चालक हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा दूत ठरतो, असेही ते म्हणाले.
केवळ प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र दाखविल्याने कारवाई टळणार नाही, असे स्पष्ट करत सरनाईक म्हणाले की, आरटीओ अधिकारी चालकांशी प्रत्यक्ष मराठीत संवाद साधून त्यांची व्यवहारिक मराठीची क्षमता तपासतील. चालकाला मराठीत प्रश्न समजून उत्तर देता येणं आवश्यक असेल. नियमांचे उल्लंघन किंवा मराठीचे आवश्यक ज्ञान नसल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई केली जाईल. मराठी भाषेचा वापर वाढविण्याची जबाबदारी केवळ चालकांची नसून नागरिकांचीही असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यामुळे प्रवाशांनी समोरचा चालक अमराठी आहे असे गृहीत धरून हिंदीत संवाद न साधता, शक्यतो मराठीतच बोलावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्याच्या मराठी भाषा विभागाच्या पुढाकाराने मुंबई मराठी साहित्य संघ, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त सहकार्याने हे अभियान राबविण्यात आले असून, महाराष्ट्रात मराठीचा दैनंदिन व्यवहारात अधिक व्यापक वापर व्हावा आणि प्रवासी व चालक यांच्यात सुसंवाद निर्माण व्हावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
