ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीएकडून आनंदनगर ते साकेतदरम्यान उभारण्यात येत असलेल्या एलिव्हेटेड रस्त्याच्या कामामुळे इंदिरानगर संकुलाकडे जाणारी ८१३ मि.मी. व्यासाची जलवाहिनी बाधित होत आहे. या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएने ९०० मि.मी. व्यासाची नवीन जलवाहिनी अंथरण्याचे काम हाती घेतले असून एकूण २२०० मीटरपैकी ८०० मीटर अंतराचे काम पूर्ण झाले आहे. आता अस्तित्वातील ८१३ मि.मी. जलवाहिनी निकामी करून नव्याने अंथरण्यात आलेली ९०० मि.मी. जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक जोडणीचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी शुक्रवार, १२ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून शनिवार, १३ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत एकूण २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेने दिली आहे.
या कालावधीत इंदिरानगर, साठेनगर, आंबेवाडी, डवलेनगर, सावरकरनगर, लोकमान्यनगर पाडा क्रमांक २, ३ व ४, चैतीनगर, परेरानगर, झांजेनगर, श्रीनगर, किसननगर, शिवटेकडी, शांतीनगर, कैलासनगर, भटवाडी, वारलीपाडा, रुपादेवी पाडा, रामनगर, सी.पी. तलाव परिसर तसेच येऊर परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाल्यानंतरही पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी त्याची नोंद घ्यावी, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. पाणीपुरवठा खंडित राहणार असल्याने आवश्यक तेवढा पाणीसाठा करून पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

