ठाणे : उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत टंचाईग्रस्त भागांमध्ये प्रभावी नियोजन करून टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे. ८ जून २०२६ अखेरच्या अहवालानुसार जिल्ह्यातील ४४ गावे आणि १४५ पाड्यांमधील तब्बल ९९ हजार ३९७ नागरिकांना ४५ टँकरच्या माध्यमातून पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने विशेष उपाययोजना हाती घेतल्या असून परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत आवश्यकतेनुसार अतिरिक्त टँकरची व्यवस्था करण्यात येत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई शहापूर तालुक्यात असून येथे ३८ गावे आणि १३५ पाडे टंचाईग्रस्त आहेत. या भागातील ९३ हजार ७३१ नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ४२ खाजगी टँकर कार्यरत आहेत. विशेषतः दुर्गम आणि आदिवासी भागांपर्यंतही नियमित पाणीपुरवठा पोहोचवण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत.
मुरबाड तालुक्यातील ६ गावे आणि १० पाड्यांमध्येही पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असून तेथील ५ हजार ६६६ नागरिकांसाठी ३ खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दरम्यान, जिल्हा परिषद केवळ टँकरपुरवठ्यावर अवलंबून न राहता दीर्घकालीन उपाययोजनांवरही भर देत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ११० बोअरवेलची कामे पूर्ण करण्यात आली असून विविध गावांमध्ये भूजल स्रोत उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय जलस्रोतांचे संवर्धन, पाण्याचा काटकसरीने वापर आणि दीर्घकालीन जलव्यवस्थापनासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी Ranjit Yadav यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन सातत्याने कार्यरत आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये नियमित टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून परिस्थितीचा दररोज आढावा घेतला जात आहे. नागरिकांना वेळेत आणि पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

