वृत्तसंस्था : आगामी आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ साठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ने भारतीय टी-२० संघाची घोषणा केली असून निवड समितीने अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. जपानमधील आयची-नागोया येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी यावेळी भारताने दुय्यम नव्हे तर पूर्ण ताकदीचा संघ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडीत मागील आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघातील अनेक खेळाडूंना वगळण्यात आले आहे. सर्वात मोठा धक्का म्हणजे टी-२० विश्वचषक विजेता कर्णधार सूर्यकुमार यादव याला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. त्याच्या जागी आयपीएलमधील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर श्रेयस अय्यर याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे, तर युवा फलंदाज तिलक वर्मा याची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मागील वेळी ऋतुराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंनी भरलेला संघ पाठवण्यात आला होता, मात्र यंदा अनुभवी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध झालेल्या खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले आहे.
यंदाच्या संघात टी-२० विश्वचषक विजेत्या संघातील अनेक प्रमुख खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांसारखे अनुभवी खेळाडू संघात दिसणार आहेत. त्याचबरोबर वैभव सूर्यवंशी या युवा खेळाडूचीही निवड करण्यात आली आहे. संघातील केवळ पाच खेळाडू असे आहेत जे विश्वचषक विजेत्या संघाचा भाग नव्हते. त्यामध्ये श्रेयस अय्यर, नितीश रेड्डी, रवी बिश्नोई, हर्षित राणा आणि वैभव सूर्यवंशी यांचा समावेश आहे. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे भारत आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक कायम राखण्यासाठी पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
