मुंबई : नरिमन पॉईंट येथील ऐतिहासिक ‘एअर इंडिया’ इमारत अधिकृतपणे महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाने सप्टेंबर २०२३ मध्ये या इमारतीच्या खरेदीला मंजुरी दिल्यानंतर आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर राज्य शासनाने Air India Assets Holding Limited कडून १,६०१ कोटी रुपये मोजून ही इमारत संपादित केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी अदा केल्यानंतर इमारतीचा ताबा अधिकृतपणे शासनाकडे आला. या संपादनामुळे राज्य शासनाच्या विविध विभागांना प्रशस्त आणि आधुनिक कार्यालयीन जागा उपलब्ध होणार असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हस्तांतरणानंतर मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले. शासकीय कार्यालये स्थलांतरित करण्यापूर्वी इमारतीची सखोल स्ट्रक्चरल तपासणी करून आवश्यक दुरुस्ती आणि नूतनीकरण करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. तसेच अंतर्गत सजावट, विद्युत यंत्रणा, तांत्रिक सुविधा आणि इतर कामांमध्ये उच्च दर्जा राखण्याचे निर्देश देण्यात आले. इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराचे महाराष्ट्राच्या वैभवाला साजेसे सुशोभीकरण करण्यासाठी नामांकित वास्तुविशारद आणि तज्ज्ञ संस्थांचे मार्गदर्शन घेण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत. राज्यभरातून मंत्रालयीन कामांसाठी मुंबईत येणाऱ्या नागरिकांची सोय, सुरक्षितता आणि सुलभता लक्षात घेऊन सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या प्रशासकीय पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे मत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.

