नागपूर : वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून शनिवारी, १८ एप्रिल २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्यात ‘हीट वेव्ह’सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासाठी १८ एप्रिल रोजी ‘यलो अलर्ट’ही जारी करण्यात आला आहे. तापमानाने आधीच ४३ अंश सेल्सियसचा टप्पा ओलांडला असून दुपारच्या वेळेत उन्हाचा कडाका अधिक तीव्र होत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेसना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. लहान मुले, वृद्ध आणि कामगार वर्गावर उष्णतेचा अधिक परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलले आहे. दरम्यान, पुढील काही दिवस हवामानाचा आढावा घेऊन गरज भासल्यास आणखी निर्णय घेतले जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. नागरिकांनी शक्यतो दुपारी बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

