वसई : रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना चाप बसावा म्हणून पश्चिम रेल्वेने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. चर्चगेट ते विरारदरम्यान पश्चिम रेल्वेकडून संरक्षण जाळ्यांना वंगण (ग्रीस) लावले जात आहे. यामुळे प्रवाशांना रेल्वे रुळ ओलांडणे कठीण होईल आणि परिणामी रेल्वे अपघातात घट होणार असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मुंबई पालघर दरम्यान विस्तारलेल्या पश्चिम रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. पण, मुंबई तसेच उपनगरीय स्थानकातील प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे लोकल सेवावरील ताण वाढला आहे. तर सकाळ आणि संध्याकाळच्या सुमारास अनेक प्रवासी वेळेची बचत करण्यासाठी किंवा घाईत असताना पादचारी पुलाचा वापर न करता थेट रुळ ओलांडून दुसऱ्या फलाटावर जाण्याचा प्रयत्न करतात.
त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील वर्दळीच्या स्थानकातील वाढत्या गर्दीमुळे चालत्या लोकलमधून पडून होणारे अपघात टाळण्यासाठी तसेच रेल्वे रुळ ओलांडण्यापासून प्रवाशांना रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेने अनोख्या उपायाची अंमलबजावणी सुरू केली आहे. चर्चगेट ते विरार दरम्यानच्या ६० किमी उपनगरीय मार्गावरील रेल्वे रुळांच्यामधे असणाऱ्या सुरक्षा जाळ्यांवर वंगण लावले जात आहे. यात २९ वर्दळीच्या स्थानकांचा समावेश असून शनिवारपर्यंत (७ फेब्रुवारी) हे काम पूर्ण केले जाणार आहे. अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या संपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच या उपाययोजनेमुळे रेल्वे जाळ्यांवर लावले जाणारे वंगण रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांच्या हाताला तसेच कपड्याला लागणे, जाळ्या ओलांडताना प्रवासी घसरणे, असे अडथळे निर्माण होतील व प्रवासी स्वतःच रूळ ओलांडण्यापासून परावृत्त होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

