वसई : पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार रेल्वे स्थानक एक गजबजलेले रेल्वे स्थानक आहे. गेल्या काही काळात वसई, विरार आणि नालासोपारा शहरात मुंबई, ठाणे, पालघर यासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातून आणि देशातील गुजरात, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि बिहारसारख्या राज्यातून मोठ्या प्रमाणावर लोकांचे स्थलांतर झाले आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर असणारी कोंडी, विरार ते ठाणे, मुंबई आणि पालघर शहरांतर्गत नसणारी बस सेवा, तसेच खाजगी वाहतूक सेवांकडून आकारले जाणारे भरमसाठ भाडे यामुळे बहुतांश प्रवासी लोकलने प्रवास करणे पसंत करतात. जलद प्रवास आणि तिकिटाच्या परवडणाऱ्या किंमती यामुळे दैनंदिन हजारो प्रवासी लोकलने प्रवास करतात.
तर वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या एसी लोकलमुळे लांब पल्ल्याचा तसेच भर उन्हाळ्यात लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास काहीसा सुखकर झाला आहे. पण, वाढती गर्दी आणि एसी लोकलच्या कमी फेऱ्या यामुळे विरारहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसी लोकलने प्रवास करताना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागत होता. तसेच काहींना नाईलाजाने एसी लोकलऐवजी दुसऱ्या लोकलने प्रवास करावा लागत होता. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली जात होती. तसेच, खासदार हेमंत सावरा यांनीही ही मागणी हिवाळी अधिवेशनात लावून धरली होती. त्यामुळे प्रजासत्ताक दिनापासून पश्चिम रेल्वे मार्गावर १२ नव्या एसी लोकल फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. यात ६ लोकल फेऱ्या अप मार्गावर तर ६ लोकल फेऱ्या डाऊन मार्गावर वाढवल्या जाणार आहेत. त्यापैकी ४ एसी लोकल फेऱ्या या विरार ते चर्चगेट मार्गावर तर २ नव्या एसी लोकल भाईंदर ते चर्चगेट मार्गावर सुरू केल्या जाणार आहेत. नव्या एसी लोकलमुळे नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.

