पुणे : राज्यात महाविकास आघाडीच्या काळात सुरू झालेली शिवभोजन थाळी शेवटच्या घटका मोजत आहे. सध्याच्या सरकारकडून ही योजना चालविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने ही योजना गुंडाळणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पहिल्या टप्प्यात अनेक केंद्रांवर थाळीची संख्या कमी करण्यात आली होती. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून केंद्र चालकांना अनुदान मिळालेले नाही. कोरोनाच्या काळात या थाळीचा अनेक गरजूंना मोठा दिलासा मिळाला. तत्कालीन महाविकास आघाडीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात विविध ठिकाणी पाच रुपयांत शिवभोजन थाळी सुरू केली होती. त्यानंतर तिची किंमत वाढवून १० रुपये करण्यात आली. दरम्यान, त्यातील काही अनुदान हे शासनाकडून देण्यात येत होते. शहरात सद्यस्थितीत १४ केंद्रे आहेत; मात्र त्यापैकी अनेक केंद्र चालकांना ही योजना परवडत नसल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
दरम्यान, अन्नपुरवठा विभागाच्या माध्यमातून या केंद्राचे नियंत्रण असल्याने पहिल्यांदा या केंद्र चालकांना वेळोवेळी बिले अदा केली जात होती. मात्र, गेल्या वर्षभरापासून या योजनांकडे दुर्लक्ष होत आहे. थाळ्यांची संख्या कमी करणे, अनुदान न देणे, केंद्रचालकांच्या समस्या ऐकू न घेणे अशा विविध कारणांमुळे ही योजना पुढे चालवायची की नाही, अशा मनःस्थितीमध्ये केंद्रचालक सापडले आहेत.

