नागपूर : “बिबट्या दिसला तर त्याला ऑन द स्पॉट शूट करा,” असे धक्कादायक विधान वनमंत्री गणेश नाईक यांनी केले. लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आणि भविष्यात असे जीव वाचवण्यासाठी ही कठोर उपाययोजना आवश्यक असल्याचे देखील ते म्हणाले. पण, वन्यजीव संरक्षण कायदा वनमंत्र्यांनी वाचला आहे का, असाही प्रश्न वन्यजीव अभ्यासकांनी उपस्थित केला आहे. प्रत्यक्षात मानव-बिबट संघर्षावर हा उपाय असू शकतो का, असा प्रश्न वन्यजीव अभ्यासकांनी उपस्थित केला आहे. मारून मारून किती बिबट मारणार, त्याने प्रश्न सुटणार आहे का, असे अनेक प्रश्न वनमंत्री गणेश नाईक यांच्या विधानातून उपस्थित झाले आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात मानव-बिबट संघर्ष वाढला आहे. लहानांपासून तर मोठ्यापर्यंत असे सर्वच बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडत आहेत. अलीकडच्या काही दिवसात हे प्रमाण वाढल्याने गावकऱ्यांचा आक्रोश वाढत चालला आहे. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना शोधण्याऐवजी राज्याचे वनखाते आणि राज्य सरकार बिबट जेरबंद करा, बिबट्याला वनतारात पाठवा, बिबट्याची नसबंदी करा, बिबट्याला दिसताक्षणी गोळी घालून ठार करा, असे विधान करत सुटले आहेत. मात्र, हे एवढे सोपे नाही आणि यामुळे प्रश्न सुटणार देखील नाही हे माहिती असूनही अशी विधाने किंवा असे आदेश दिले जात आहेत.

