पुणे : कार्तिकी एकादशी व श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त राज्यभरातून हजारो वारकरी श्रीक्षेत्र आळंदीत दाखल होतात. भाविकांच्या सोयीसाठी ‘पीएमपी’कडून १३ ते १८ नोव्हेंबरदरम्यान एकूण ३६२ जादा बससेवा सुरू करण्यात येणार आहे. या बस पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांतून सोडल्या जाणार आहेत.
भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी १५ ते १७ नोव्हेंबरदरम्यान गरजेनुसार रात्र बससेवाही उपलब्ध करून देण्यात येईल. रात्री १० नंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी १० रुपये अतिरिक्त तिकीटदर आकारण्यात येईल. दरम्यान, आळंदी यात्रेदरम्यान वाहतुकीच्या सोयीसाठी काही बदल करण्यात आले आहेत. आळंदी मार्गावरील २६४ (भोसरी–पाबळ) आणि २५७ (आळंदी–मरकळ) या मार्गांवरील नियमित बससेवा पूर्णपणे बंद राहील. तसेच, सध्याचे आळंदी बसस्थानक काटे वस्ती येथे तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले असून, तेथून बसचे संचालन केले जाईल.

