मुंबई : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणानंतर सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या धर्तीवर आता ‘E20 जनता पार्टी’ नावाचे एक नवीन डिजिटल नागरिक अभियान (Citizen Campaign) वेगाने लोकप्रिय होत आहे. ही कोणतीही नोंदणीकृत राजकीय संघटना किंवा अधिकृत राजकीय पक्ष नसून, वाहनचालक आणि ग्राहकांच्या हक्कांसाठी सुरू करण्यात आलेली स्वतंत्र सोशल मीडिया मोहीम असल्याचे अभियानाच्या आयोजकांनी स्पष्ट केले आहे. ‘एक्स’ (X) आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत असून, अल्पावधीतच लाखो नागरिकांनी या अभियानाशी जोडले गेल्याचा दावा करण्यात येत आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित इंधन (E20) धोरणाला पूर्णपणे विरोध करणे नसून, ग्राहकांना इंधन निवडीचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी करणे हा आहे. देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर E20 इंधनासोबतच १०० टक्के शुद्ध (इथेनॉल-मुक्त) पेट्रोल उपलब्ध असावे, अशी या अभियानाची प्रमुख मागणी आहे. वाहनासाठी कोणते इंधन योग्य आहे, याचा अंतिम निर्णय वाहनचालकाने आणि वाहन उत्पादकांच्या शिफारशीनुसार घ्यावा, असा या मोहिमेचा आग्रह आहे. तसेच वाहन उत्पादक कंपन्यांनी ज्या प्रकारच्या इंधनाची शिफारस केली आहे, तेच इंधन ग्राहकांना सहज उपलब्ध व्हावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांवर कोणत्याही प्रकारचे इंधनविषयक प्रयोग सक्तीने लादू नयेत, ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि इंधन धोरणांबाबत पारदर्शक व निष्पक्ष सार्वजनिक चर्चा व्हावी, असे या अभियानाचे म्हणणे आहे.
सोशल मीडियावर या मोहिमेअंतर्गत विविध मीम्स, व्यंगचित्रे आणि पोस्ट्सद्वारे नागरिक आपली भूमिका मांडत आहेत. “आमची वाहने प्रयोगशाळा नाहीत” हा संदेश या मोहिमेचा प्रमुख घोषवाक्य ठरला आहे. नागरिकांच्या मते, स्वतःच्या कष्टाच्या पैशातून आणि कर भरून खरेदी केलेली वाहने ही केवळ प्रवासाचे साधन नसून अनेक कुटुंबांच्या रोजगाराचे आणि दैनंदिन उपजीविकेचे प्रमुख माध्यम आहेत. त्यामुळे इंधनाच्या गुणवत्तेचा, इंजिनच्या कार्यक्षमतेचा आणि वाहनाच्या आयुष्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आर्थिक स्थितीवर होत असल्याचा युक्तिवाद या मोहिमेतून केला जात आहे. विशेषतः जुन्या किंवा विशिष्ट प्रकारच्या वाहनांवर नवीन इंधन सक्तीने वापरण्याऐवजी ग्राहकांना योग्य पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, या अभियानाच्या संस्थापकांनी सोशल मीडियावरून स्पष्ट केले आहे की, या मोहिमेचा कोणत्याही राजकीय पक्षाशी, विचारसरणीशी किंवा राजकीय अजेंड्याशी संबंध नाही. हे पूर्णपणे स्वतंत्र आणि निष्पक्ष नागरिक अभियान असून, इंधनाच्या गुणवत्तेबाबत पारदर्शकता आणि ग्राहकांच्या अधिकारांवर चर्चा घडवून आणणे हाच त्याचा उद्देश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी चर्चेत आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ या व्यंगात्मक डिजिटल अभियानाशी तुलना होत असली, तरी ‘E20 जनता पार्टी’चे लक्ष केवळ इंधन धोरण, ग्राहकांचे पर्याय आणि वाहनधारकांच्या हिताच्या मुद्द्यांवर केंद्रित असल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात येत आहे.
