ठाणे : मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. टिटवाळा स्थानकावर १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाट विस्ताराचे काम हाती घेण्यात येत असल्याने मध्य रेल्वेवर १५ दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक २८ आणि २९ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून सुरू होऊन ११ ते १२ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत दररोज रात्री सुमारे ५ ते ६ तास ब्लॉक घेतला जाणार असून, त्यामुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत, तर काही गाड्या अर्ध्या मार्गापर्यंतच धावतील. ब्लॉकच्या पहिल्या टप्प्यात २८-२९ ऑगस्ट ते १-२ सप्टेंबरदरम्यान कल्याण-वाशिंद स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ईशान्य मार्गावर रात्री ११.३० ते पहाटे ५.१० वाजेपर्यंत ब्लॉक राहणार आहे. या काळात टिटवाळा-कसारा दरम्यान उपनगरी रेल्वे सेवा उपलब्ध राहणार नाही. २८ ऑगस्ट रोजी सीएसएमटीहून टिटवाळ्यासाठी रात्री १०.००, १०.५० आणि ११.४२ वाजताच्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच २९ ऑगस्टच्या मध्यरात्री सीएसएमटीहून कसाऱ्यासाठी १२.०८ वाजताची लोकलही रद्द राहील. टिटवाळाहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या रात्री ९.०० आणि १०.०६ वाजताच्या लोकल, तसेच टिटवाळा-ठाणे ११.१४ वाजताची आणि आसनगाव-ठाणे ११.०८ वाजताची लोकलही रद्द करण्यात आली आहे. याशिवाय सीएसएमटी-आसनगाव ८.५६ वाजताची लोकल टिटवाळ्यापर्यंतच धावणार असून, डोंबिवली-सीएसएमटी आणि कल्याण-सीएसएमटीच्या काही रात्रीच्या सेवा ठाण्यापर्यंतच मर्यादित राहतील.
ब्लॉकपूर्वी कसाऱ्यासाठी सीएसएमटीहून रात्री १०.४७ वाजता आणि टिटवाळ्यासाठी रात्री ११.१६ वाजता शेवटच्या लोकल सुटतील. ब्लॉकनंतर कसाऱ्यासाठी पहिली लोकल पहाटे ४.१९ वाजता, तर टिटवाळ्यासाठी पहिली लोकल पहाटे ४.३२ वाजता सुरू होईल. कसाऱ्याहून सीएसएमटीकडे पहिली लोकल पहाटे ३.१५ वाजता सुटणार आहे. २९ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान टिटवाळ्यापर्यंतच्या काही सेवा आसनगावपर्यंत वाढवण्यात येणार असून, टिटवाळ्याहून सुटणाऱ्या काही लोकल आसनगावहून सुरू केल्या जातील. काही वातानुकूलित आणि नियमित लोकल ठाणे किंवा कल्याणपर्यंतच धावणार असल्याने प्रवाशांनी वेळापत्रक तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. या विशेष ब्लॉकचा परिणाम मेल आणि एक्सप्रेस गाड्यांवरही होणार आहे. गोरखपूर-दादर आणि बलिया-दादर एक्सप्रेसचे वाशिंद व आटगाव येथे नियमन करण्यात येणार असून, ज्ञानेश्वरी एक्सप्रेस, शालीमार-एलटीटी एक्सप्रेस, हावडा-सीएसएमटी मेल आणि मऊ-एलटीटी एक्सप्रेस या गाड्यांना १० ते २० मिनिटांचा विलंब होण्याची शक्यता आहे. तसेच काही विशेष आणि मेल-एक्सप्रेस गाड्यांचे मार्ग परिस्थितीनुसार बदलले जाऊ शकतात. त्यामुळे मध्य रेल्वेवरील रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अद्ययावत वेळापत्रक आणि रेल्वेच्या सूचनांची माहिती घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
