सांगली : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पहिला ४ मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प बसरगी (ता. जत) येथे सुरू झाला आहे. यामुळे बसरगी, सिंदूर आणि गुगवाड येथील १,१०० शेतकऱ्यांना दिवसा शेतीसाठी वीजपुरवठा होईल.
कृषी वाहिन्यांना सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या पीएम कुसुम योजनेवर आधारित मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२ राबवली जात आहे. हा प्रकल्प सांगली जिल्ह्यातील पहिला असून, राज्यातील १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाचा एक भाग आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२ अंतर्गत जिल्ह्यात ३४ ठिकाणी एकूण २०७ मेगावॅट क्षमता असलेले सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांच्या पूर्णतेनंतर ७५ कृषी वाहिन्यांवर शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे, तसेच कमी दाबाच्या (लो व्होल्टेज) तक्रारीही दूर होतील. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसाठीही मदत होईल.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२ अंतर्गत जिल्ह्यात जमीन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी आणि प्रशासनाच्या टीमचे महत्वाचे योगदान मिळाले आहे. भूमी अभिलेख कार्यालय आणि जिल्हा परिषद यांचे सहकार्यही महत्वाचे ठरले आहे. प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामपंचायतींना पाच लाख रुपये एकरकमी अनुदान दिले जात आहे, अशी माहिती महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्निल काटकर यांनी दिली.
सौरऊर्जा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहेत. यामुळे दिवसा वीज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. यामुळे येणाऱ्या काही वर्षांत विजेचे दर कमी होण्यासही मदत होईल. महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्निल काटकर यांनी ग्रामपंचायतींना या पर्यावरणपूरक विकासकामात सहभागी होण्याचे तसेच महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन केले.