बदलापूर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाण्याची गढूळता वाढल्याने बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जल व्यवस्थापन उपविभागाने केले आहे. बदलापूर शहराला उल्हास नदीतून पाणीपुरवठा केला जातो. नदीवरील बंधाऱ्यावरून पाण्याची उचल करून जलशुद्धीकरण प्रकल्पात आवश्यक प्रक्रिया केल्यानंतर हे पाणी बदलापूर आणि अंबरनाथ शहरांना पुरवले जाते. मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात माती आणि गाळ नदीत मिसळल्याने पाणी गढूळ होते. जलशुद्धीकरणाची प्रक्रिया करूनही काही दिवस पाण्याचा रंग गढूळ दिसू शकतो. त्यामुळे नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून घरात येणारे पाणी गाळून आणि उकळूनच पिण्यासाठी वापरावे, तसेच जलजन्य आजारांपासून बचावासाठी स्वच्छतेची काळजी घ्यावी, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
प्राधिकरणाने नागरिकांना घरगुती पाणीपुरवठा व्यवस्थेबाबतही दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे. पाण्याची नळजोडणी गटार किंवा सांडपाण्याच्या प्रवाहातून जात नसल्याची खात्री करून आवश्यक असल्यास ती सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावी. जलवाहिनी किंवा घरातील नळजोडणीला गळती असल्यास ती तातडीने दुरुस्त करून दूषित पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळणार नाही, याची काळजी घ्यावी. बहुमजली इमारतींतील पाण्याच्या साठवण टाक्यांची नियमित स्वच्छता करावी तसेच नळजोडणीवरील मीटरची जाळी वेळोवेळी साफ करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुख्य जलवाहिनीला गळती आढळल्यास किंवा दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार असल्यास नागरिकांनी प्रशासनाशी तातडीने संपर्क साधावा. त्यासाठी बदलापूर पूर्व विभागासाठी करण राठोड (९०४९१८१५५९), बदलापूर पश्चिम विभागासाठी आशिष सातपुते (८०९७६६९१४९) तसेच मदतीसाठी ७३८७७०४२६० हा संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
