ठाणे : मिरा-भाईंदर आणि ठाणे शहरात पंचतारांकित हॉटेल उभारण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून, मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या विहंग ग्रुपने Radisson Hotel Group सोबत करार केला आहे. या प्रकल्पामुळे मिरा-भाईंदर शहरात प्रथमच फाईव्ह स्टार हॉटेल उभारले जाणार आहे. हा निर्णय खासगी स्वरूपाचा असला तरी यामुळे स्थानिक पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडेल, असा दावा करण्यात आला आहे. दोन्ही शहरांमध्ये भागीदारी पद्धतीने हॉटेल उभारण्यात येणार असून, यामुळे पर्यटन, व्यवसाय आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. नरेंद्र मेहता यांनी भाईंदर पाडा येथील जमिनीबाबत विहंग ग्रुपवर भूमिपुत्रांची जमीन बळकावल्याचा आरोप केला होता. यावर प्रत्युत्तर देताना सरनाईक यांनी मेहता यांना कायदेशीर नोटीस बजावली असून आरोप फेटाळून लावले आहेत. राज्यात मालमत्ता जाहीर करणाऱ्या नेत्यांमध्ये आपण तिसऱ्या क्रमांकावर असल्याचा दावा करत त्यांनी टीकाकारांवर पलटवार केला. “माझ्यावर आरोप करणाऱ्या व्यक्तीवरच गरीब व स्थानिकांची जमीन बळकावण्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत,” असे म्हणत प्रसिद्धीसाठी करण्यात येणाऱ्या आरोपांकडे दुर्लक्ष करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
