वृत्तसंस्था : तमिळनाडूमधील नवनिर्वाचित मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या शिफारशीनुसार राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांनी नवीन मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले आहे. शनिवारी, १६ मे २०२६ रोजी लोकभवनाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत यादीनुसार मुख्यमंत्री विजय यांनी गृह, सामान्य प्रशासन, पोलीस तसेच महिला आणि युवा कल्याण यांसारखी महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवली आहेत. नव्या मंत्रिमंडळात एकूण १० मंत्र्यांना विविध खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
एन. आनंद यांच्याकडे ग्रामीण विकास आणि जलसंपदा खाते सोपवण्यात आले असून, आधव अर्जुन सार्वजनिक बांधकाम आणि क्रीडा विकास विभाग सांभाळणार आहेत. तसेच के. ए. सेंगोत्तैयन यांच्याकडे वित्त खाते, तर के. जी. अरुणराज यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय पी. वेंकटरामनन अन्न व नागरी पुरवठा खाते पाहणार असून, आर. निर्मलकुमार यांच्याकडे ऊर्जा आणि कायदा खाते सोपवण्यात आले आहे. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाच्या दोन दिवस आधीच राज्य सरकारने पोलीस विभागात मोठा प्रशासकीय फेरबदल केला आहे. गुरुवारी, १४ मे २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या सरकारी आदेशानुसार गुप्तचर शाखेसह विविध विभागांतील १० हून अधिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. गुप्तचर शाखेच्या पोलीस महासंचालक बी. बाला नागा देवी यांची चेन्नई येथील सायबर गुन्हे शाखेच्या डीजीपीपदी बदली करण्यात आली आहे. तसेच राजीव कुमार यांची पोलीस महासंचालक (प्रशिक्षण) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या सरकारच्या स्थापनेनंतर प्रशासन आणि पोलीस यंत्रणेत वेगाने बदल करण्यात येत असल्याचे या निर्णयांवरून स्पष्ट होत आहे.
