मुंबई : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे ‘सूर्या’ नावाच्या आठ वर्षीय नर बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. मागील काही दिवसांपासून त्याच्यावर मूत्रपिंड आणि यकृताशी संबंधित गंभीर विकारांवर उपचार सुरू होते. मात्र प्रकृती खालावत गेल्याने अखेर १७ मे रोजी त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती उद्यान प्रशासनाने सोमवारी दिली. सूर्याला २०१८ मध्ये अहिल्यानगर वन विभागातून उद्यानात आणण्यात आले होते. त्यावेळी तो केवळ दोन महिन्यांचा बछडा होता. त्यानंतर मागील आठ वर्षांपासून त्याचे संगोपन, देखभाल आणि वैद्यकीय निगा उद्यानातच राखण्यात येत होती. १३ मे रोजी सूर्याच्या प्रकृतीत अचानक बदल जाणवल्यानंतर त्याच्यावर विविध वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. तपासणीत त्याला मूत्रपिंड आणि यकृताशी संबंधित गंभीर विकार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते.
उद्यान प्रशासनाच्या माहितीनुसार, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे वाचविण्यात आलेल्या अनेक बिबट्यांवर उपचार करून त्यांना विशेष देखरेखीखाली ठेवले जाते. काही वेळा मानवी वस्तीतून पकडण्यात आलेल्या बिबट्यांनाही येथे आणले जाते. उपचारानंतर वैद्यकीय अहवाल समाधानकारक असल्यास त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येते, तर काही प्राण्यांची दीर्घकाळ देखभाल उद्यानातच केली जाते. राज्यातील इतर वन विभागांकडूनही अनेकदा लहान बछडे येथे आणले जातात आणि त्यांचे विशेष संगोपन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते. तसेच उद्यानातर्फे वन्यप्राणी दत्तक योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत नागरिकांना ठराविक शुल्क भरून वर्षभरासाठी वन्यप्राणी दत्तक घेण्याची संधी दिली जाते. यापूर्वी राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी बिबट्यांसह विविध वन्यप्राणी दत्तक घेतले आहेत.

