मुंबई : राज्यातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे, विशेषतः असुरक्षित घटकांचे संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाने तीन सविस्तर मानक कार्यपद्धती (एसओपी) जाहीर केल्या आहेत. राज्य उष्णता कृती आराखडा आणि भारतीय हवामान विभागाच्या रंग-कोडेड सतर्कतांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या या मार्गदर्शक सूचनांचा उद्देश उष्णतेमुळे होणारे आजार व मृत्यू कमी करणे हा आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी या उपाययोजना अनौपचारिक क्षेत्रातील कामगार, खाण कामगार आणि कमी उत्पन्न गटांसाठी विशेषतः उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. या एसओपीमध्ये लातूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलडाणा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, जळगाव, नंदुरबार, धुळे आणि नांदेड या १५ उच्च-उष्णता-जोखमीच्या जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. बाहेर काम करणारे मजूर, रस्त्यावरील विक्रेते, वाहतूक पोलीस, स्वच्छता कर्मचारी आणि डिलिव्हरी कर्मचारी यांच्यासाठी कामाचे वेळापत्रक बदलणे, पाणी व विश्रांतीची सुविधा, सावली व्यवस्था आणि आरोग्य सेवा मजबूत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दुसऱ्या आणि तिसऱ्या एसओपीमध्ये चंद्रपूरमधील कोळसा खाण कामगारांसाठी उष्णता ताण व्यवस्थापन तसेच उष्णता-प्रतिरोधक गृहनिर्माणावर भर देण्यात आला आहे. खाण कामगारांसाठी थंड विश्रांती केंद्रे, पुरेसा पाणीपुरवठा, वायुवीजन, कामाचे नियोजन, जॉब रोटेशन आणि उष्णता आजार ओळख प्रशिक्षण यांचा समावेश आहे. तर गृहनिर्माणासाठी कूल रूफ, हरित क्षेत्रे, थर्मल सुधारणा आणि हवामान-संवेदनशील नियोजन यासारख्या उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. तात्काळ, मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या टप्प्यांमध्ये या उपायांची अंमलबजावणी केली जाणार असून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महापालिका आणि इतर विभागांच्या समन्वयातून ती राबवली जाईल. वाढत्या तापमानामुळे राज्यातील काही भागांत तापमान ४७ ते ४९ अंशांपर्यंत पोहोचत असल्याने प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. जनजागृती मोहिमा राबवून नागरिकांना दुपारी ११ ते ४ या वेळेत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून, या एसओपींची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

