ठाणे : मुसळधार पावसामुळे तुर्भे आणि कोपरखैरणे रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाखालील माती वाहून गेल्याने ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे प्रशासनाने पहाटेच्या सुमारास या मार्गावरील रेल्वे सेवा तात्पुरती बंद ठेवली होती. परिणामी ठाणे, कसारा आणि कर्जत परिसरातून नवी मुंबईकडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. नवी मुंबईमध्ये विविध उद्योग, कारखाने आणि खासगी कंपन्यांची कार्यालये असल्याने दररोज लाखो प्रवासी ट्रान्स हार्बर मार्गाचा वापर करतात. ठाणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक नऊ आणि दहा येथून वाशी, नेरुळ आणि पनवेलकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या सुटतात. मात्र बुधवारी पहाटे झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास रेल्वे रुळाखालील माती वाहून गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रुळांची सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने तत्काळ वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले असले तरी सकाळच्या गर्दीच्या वेळेत हजारो प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाने घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीची कामे हाती घेतली. रुळांची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात आली. मात्र या काळात ठाणे स्थानकात मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी झाली होती. लोकल सेवा बंद असल्याने आणि काही गाड्या उशिराने धावत असल्याने फलाटांवर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली. अनेक नोकरदारांना वेळेत कार्यालय गाठणे कठीण झाले, तर काहींना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला. अनेक प्रवाशांनी रिक्षा, बस तसेच खासगी वाहनांचा वापर करून प्रवास पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रस्ते वाहतुकीवरही अतिरिक्त ताण निर्माण झाला. दरम्यान, दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने वाहतूक पूर्ववत सुरू केली. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ७ वाजून २८ मिनिटांनी ठाण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली, तर सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी नवी मुंबईच्या दिशेने रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. त्यामुळे सुमारे अडीच तास विस्कळीत झालेली वाहतूक हळूहळू सुरळीत झाली. मात्र या घटनेमुळे सकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

