वसई : वसई विरार शहरात छठपूजेदरम्यान सूर्याला दाखविल्या जाणाऱ्या अर्ध्य देण्यासाठी नैसर्गिक तलवात पालिकेने परवानगी दिली आहे.मात्र या परवानगीनंतर शहरातून पालिकेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.यापूर्वी झालेल्या गणेशोत्सव व नवरात्री उत्सवावेळी तलाव बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे आता पालिकेकडून एकप्रकारे दुजाभाव करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
२७ आणि २८ ऑक्टोबरला उत्तरभारतीय बांधवांचा छठपूजा उत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्त समुद्र, तलाव, नदीकिनारे येथे जमा होऊन सूर्योदय आणि सूर्यास्तच्या कालावधीत पूजा केली जाते. पण, पूजेदरम्यान नैसर्गिक जलस्त्रोत प्रदूषित होऊ नये यासाठी कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात यावी अशा सूचना उच्च न्यायालयाने दिल्या आहेत. मात्र छठ पुजेदरम्यान नैसर्गिक जलस्त्रोताच्या ठिकाणी सूर्य देवतेला अर्ध्य दिला जातो. यासाठी पारंपारीक पद्धतीने छठ पूजा साजरी करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. याबाबत लोकप्रतिनिधीनी पालिकेकडे मागणी केली होती. त्यानुसार वसई विरार महापालिकेने नैसर्गिक तलावात अर्ध्य देण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

