ठाणे : मध्य रेल्वे मार्गावरील कळवा आणि मुंब्रा स्थानका दरम्यान १२ वीच्या विद्यार्थ्याचा परीक्षा केंद्रावर जाताना रेल्वे रुळावर मृतदेह आढळला. सोहम कठरे (१८) असे मृत मुलाचे नाव असून रेल्वेगाडीतील गर्दीमुळे तोल जाऊन त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सोहम याच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रवासी संघटनांनी देखील आक्रमक भूमिका घेऊन रेल्वे प्रशासनाचा निषेध नोंदविला. तसेच निषेध व्यक्त करण्यासाठी बुधवारी (आज) काळे कपडे किंवा काळी मुखपट्टी वापरून प्रवास करण्याचे आवाहन प्रवाशांना केले आहे.
सोहम कठरे हा १२ वी मध्ये विज्ञान शाखेतून कळवा येथील न्यू कळवा महाविद्यालयात शिक्षण घेत होता. १२ वीच्या परीक्षा सुरु झाल्याने त्याचे कळवा येथील मनीषा विद्यालय शाळेमध्ये परीक्षा केंद्र होते. सोहमच्या वडिलांचे कळवा येथे सराफाचे दुकान होते. परंतु वैयक्तिक कारणामुळे सोहम आणि त्याचे कुटुंब डोंबिवली येथील आजदेगाव भागात महिन्याभरापूर्वीच वास्तव्यास गेले. १२ वीची परीक्षा सुरु झाल्याने तो डोंबिवली येथून कळवा येथे परीक्षा देण्यासाठी निघाला होता. मंगळवारी सकाळी तो जखमी अवस्थेत कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे रुळांजवळ आढळून आला. घटनेची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सोहम याला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, हा अपघात रेल्वेतील गर्दीमुळे तोल गेल्याने झाला असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपघाता प्रकरणातील प्रत्यक्षदर्शींचा शोध सुरु असल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिली. दरम्यान, या घटनेनंतर प्रवासी संघटनांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरवर्षी शेकडो नागरिकांचा रेल्वे अपघातात मृत्यू होतो. आता अवघ्या १८ वर्षांच्या सोहमचा मृत्यू झाल्याने प्रवासी संघटनांकडून निषेध व्यक्त केला.

