नवी मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाला नवी मुंबईकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचे महत्त्व ओळखून नागरिक मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी होत आहेत. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही मतदारसंघांमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) भेटीचे विशेष कॅम्प आयोजित करण्यात आले. या विशेष कॅम्पला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत मतदारयादी पुनरीक्षणाच्या राष्ट्रीय उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या नियंत्रणाखाली २४ जुलै रोजी रात्री ८ वाजल्यापासून २७ जुलै रोजी सकाळी १० वाजेपर्यंत झालेल्या दोन दिवसांच्या विशेष कॅम्पमध्ये ४१ हजार ७७५ मतदारांना गणनापत्राच्या (Enumeration Form) दोन प्रती वितरित करण्यात आल्या, तर ४३ हजार ३२८ नागरिकांच्या गणनापत्रांचे डिजिटलायझेशन पूर्ण करण्यात आले. आतापर्यंत एकूण ६ लाख ७१ हजार २६४ मतदारांना गणनापत्रे वितरित करण्यात आली असून २ लाख ७२ हजार ४२० नागरिकांच्या गणनापत्रांचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले आहे.
ऐरोली मतदारसंघात मतदार नोंदणी अधिकारी प्रिती पाटील यांच्या नियंत्रणाखाली ८० हून अधिक ठिकाणी विशेष कॅम्प घेण्यात आले. या कॅम्पमध्ये दोन दिवसांत २५ हजार ६८७ नागरिकांना गणनापत्रे वितरित करण्यात आली, तर २१ हजार ९२० गणनापत्रांचे डिजिटलायझेशन करण्यात आले. आतापर्यंत या मतदारसंघात ३ लाख ४७ हजार ८३३ मतदारांना गणनापत्रे वितरित करण्यात आली असून १ लाख ३४ हजार ७२७ नागरिकांच्या अर्जांचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले आहे. बेलापूर मतदारसंघात मतदार नोंदणी अधिकारी अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ९८ ठिकाणी आयोजित विशेष कॅम्पमध्ये १५ हजार ६६८ नागरिकांना गणनापत्रे देण्यात आली, तर २१ हजार ४०८ गणनापत्रांचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले. आतापर्यंत बेलापूर मतदारसंघात ३ लाख २३ हजार ४३१ मतदारांना गणनापत्रे वितरित करण्यात आली असून १ लाख ३७ हजार ६९३ नागरिकांच्या गणनापत्रांचे डिजिटलायझेशन झाले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी एसआयआर कार्यक्रमाची मुदत ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. प्रत्येक पात्र मतदाराने आपले गणनापत्र भरून संबंधित बीएलओकडे जमा करणे आवश्यक असून त्याचे डिजिटलायझेशन करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच मतदारांना आपल्या भागातील बीएलओची माहिती अधिकृत लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात आली असून, इच्छुक मतदार https://voters.eci.gov.in या नागरिक सेवा पोर्टलवर घरबसल्या ऑनलाइन गणनापत्रही भरू शकतात. विशेषतः २०२४ च्या मतदारयादीत नाव असलेल्या, मात्र २००२ च्या मतदारयादीत नाव नसलेल्या मतदारांनी आपल्या पालक किंवा आजी-आजोबांच्या २००२ मधील मतदार नोंदीची माहिती शोधून गणनापत्रात नमूद करावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. “कोणतीही पात्र व्यक्ती मतदारयादीतून वगळली जाणार नाही आणि कोणत्याही अपात्र व्यक्तीचा समावेश होणार नाही,” या उद्दिष्टाने सुरू असलेल्या या राष्ट्रीय उपक्रमात प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने सहभागी व्हावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी केले आहे.

