मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कचरा व्यवस्थापन प्रणालीचे आधुनिकीकरण आणि सुसूत्रीकरण करण्यासाठी महापालिकेने एक महत्त्वाकांक्षी योजना विकसित केली आहे. या योजनेअंतर्गत, शहरभर ९८८ अत्याधुनिक कचरा संकलन वाहने तैनात केली जातील. यात इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य दिले जाईल. शहरात दररोज अंदाजे ७,००० टन कचरा निर्माण होतो. यामुळे महापालिकेसमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. सध्याची कचरा वाहने जुनी आणि अपुऱ्या क्षमतेची आहेत. यामुळे अनेकदा वेळेवर कचरा संकलन होत नाही. हा नवीन उच्च-तंत्रज्ञानाचा ताफा ही समस्या सोडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या नवीन योजनेअंतर्गत समाविष्ट होणाऱ्या वाहनांमध्ये १४४ इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश असेल, जे पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल मानले जाते. ही वाहने कार्बन उत्सर्जन कमी करतील आणि शहर अधिक स्वच्छ व हरित बनविण्यात मदत करतील. नवीन कचरा वाहने अनेक आधुनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज असतील, ज्यात गळती-प्रतिबंधक प्रणालीचा समावेश आहे, जी सांडपाणी रस्त्यावर सांडण्यापासून रोखेल. याव्यतिरिक्त हायड्रॉलिक सीलिंग प्रणाली दुर्गंधी आणि घाण नियंत्रित करेल. ही वाहने पुढे आणि मागे कॅमेऱ्याऱ्यांनी सुसज्ज असतील. यामुळे रिअल-टाइम देखरेख शक्य होईल. इतकेच नव्हे, तर चालकाची केबिन वातानुकूलित असेल, ज्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी कामाचे उत्तम वातावरण मिळेल. महापालिकेने वेगवेगळ्या भागांच्या गरजेनुसार विविध क्षमतेची वाहने आणण्याचा निर्णय घेतला आहे. अरुंद रस्त्यासाठी लहान वाहने (अंदाजे ६०० किलो क्षमता) आणि मुख्य रस्त्यांसाठी मोठी वाहने (७ टन क्षमता) तैनात केली जातील. हा प्रकल्प राबविण्यासाठी अंदाजे ४,००० कोटी रुपये लागणार असून तो टप्याटप्याने पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

