मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील दिव्यांग नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. आता दृष्टिहीन तसेच ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या नागरिकांना ‘बेस्ट’च्या साध्या विनावातानुकूलित बसमधून पूर्णपणे मोफत प्रवास करता येणार आहे. या योजनेसाठी मुंबई महापालिकेने ₹७ कोटी ६४ लाख ५५ हजार १७० इतक्या अनुदानाला मंजुरी दिली असून अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविण्यात आला आहे. दिव्यांग नागरिकांना सवलतीचा लाभ सुरळीत मिळावा यासाठी त्यांच्या दिव्यांगत्व प्रमाणपत्रांची काटेकोर पडताळणी केली जाणार असून, ही संपूर्ण जबाबदारी बेस्ट उपक्रमाकडे असेल. तसेच प्रत्येक तिमाहीतील खर्चाचा लेखापरीक्षित अहवाल, ओळखपत्रांची नोंद आणि तिकीट वितरण यंत्रातील माहिती सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. संपूर्ण प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार आहे.
दिव्यांग व्यक्तींना समान संधी, संरक्षण आणि संपूर्ण सहभाग मिळावा या उद्देशाने महापालिका सातत्याने विविध योजना राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बेस्ट बसमधील मोफत प्रवासाची सुविधा अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नियमांनुसार महापालिकेला आपल्या अंदाजपत्रकातील किमान ५ टक्के निधी दिव्यांगांच्या कल्याणासाठी राखीव ठेवावा लागतो. यापैकी ₹५ कोटी महिला व बालकल्याण विभागाच्या तरतुदीतून उपलब्ध करून देण्यात येणार असून, उर्वरित ₹२ कोटी ६४ लाख ५५ हजार १७० नियोजन विभागाच्या निधीतून पुनर्वाटप करून दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे, मागील आर्थिक वर्षात या योजनेसाठी ₹४ कोटी ८८ लाख ४ हजार ९८३ इतके अनुदान देण्यात आले होते. यंदा मंजूर करण्यात आलेली वाढीव रक्कम दिव्यांग नागरिकांच्या मोफत प्रवासाची सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाची ठरणार असून, हजारो लाभार्थ्यांना याचा थेट फायदा होणार आहे.
