मुंबई : मध्यपूर्वेत सध्या मोठा संघर्ष सुरू आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळं ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ सध्या जगातील सर्वात धोकादायक सागरी मार्ग बनली आहे. अशा परिस्थितीत, सौदी अरेबियातून कच्चे तेल घेऊन भारतात येणारे लायबेरियाचा ध्वज असलेले ‘शेनलाँग सुएझमॅक्स’ (Shenlong Suezmax) हे जहाज मुंबई बंदरात पोहोचलं आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्ष सुरू झाल्यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताकडे जाणारा पहिला जहाज ठरला आहे. या जहाजामधील टँकरमध्ये १ मार्च रोजी सौदी अरेबियातील रास तनुरा बंदरातून कच्चे तेल भरले होते आणि ३ मार्च रोजी ते निघाले होते. सागरी ट्रॅकिंग डेटावरून असं दिसून आलं की, हे जहाज ८ मार्च रोजी होर्मुझच्या सामुद्रधुनीत पोहोचले. दरम्यान, हे जहाज बुधवारी दुपारी १ वाजता मुंबई बंदरात दाखल झाले आणि सायंकाळी ६.०६ वाजता जवाहर द्वीप इथं थांबलं. या जहाजामध्ये १,३५,३३५ मेट्रिक टन कच्चे तेल आहे. जे पूर्व मुंबईतील माहुल येथील रिफायनरीजसाठी पाठवले जाणार आहे. कच्चे तेल जहाजातून खाली करण्याच्या प्रक्रियेला जवळपास ३६ तास लागण्याची शक्यता आहे. हे जहाज शेनलाँग शिपिंग लिमिटेडच्या मालकीचे आहे आणि अथेन्सच्या डायनाकॉम टँकर मॅनेजमेंट लिमिटेडद्वारे व्यवस्थापित केलं जातं. या जहाजात भारतीय, पाकिस्तानी आणि फिलिपिनो नागरिकांसह २९ क्रू मेंबर्स आहेत. तर जहाजाचं नेतृत्व एका भारतीयाकडे आहे.

