वृत्तसंस्था : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ संदर्भात गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः मालिकेतील जेठालाल हे लोकप्रिय पात्र साकारणारे अभिनेते दिलीप जोशी मालिका सोडणार असल्याच्या अफवांमुळे चाहत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. गेली १८ वर्षे प्रेक्षकांचे सातत्याने मनोरंजन करणाऱ्या या मालिकेने घराघरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. मालिकेतील अनेक कलाकार कालांतराने बदलले, तर काही नव्या कलाकारांनीही शोमध्ये प्रवेश केला. तरीही जेठालाल हे पात्र सुरुवातीपासून मालिकेचा प्रमुख आधार राहिले असून, त्यांच्या विनोदी अभिनयामुळे हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले आहे. त्यामुळे दिलीप जोशी मालिकेतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चेमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र, या सर्व चर्चांवर आता मालिकेच्या निर्मात्यांनी पूर्णविराम दिला आहे.
आज तकशी संवाद साधताना मालिकेच्या निर्मात्यांनी स्पष्ट केले की, दिलीप जोशी मालिका सोडत नसून जेठालाल हे पात्रही कायम राहणार आहे. त्यांनी सांगितले की, मालिकेची कथा आजही जेठालालभोवतीच फिरत असून, त्यांच्या भूमिकेला कोणताही धोका नाही. त्यामुळे सोशल मीडियावर पसरलेल्या सर्व अफवा पूर्णपणे निराधार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, २८ जुलै रोजी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचा १८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, मालिकेचा नवीन प्रोमोही प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये जेठालाल आणि तारक मेहता धावपळ करताना दिसत आहेत. जेठालाल दुकान उघडण्यासाठी पोहोचल्यावर दुकानाला कुलूप लागलेले दिसते आणि त्यानंतर दंड भरावा लागू नये म्हणून त्यांची सुरू होणारी धावपळ विनोदी पद्धतीने दाखवण्यात आली आहे. या नव्या कथानकामुळे आगामी भाग प्रेक्षकांसाठी अधिक मनोरंजक ठरणार असल्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे जेठालाल शो सोडणार असल्याच्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, दिलीप जोशी यांच्यासह मालिका पूर्वीप्रमाणेच प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहणार आहे.
