वृत्तसंस्था : ‘ठरलं तर मग’ मालिका गेली तीन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेतल्या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. काही दिवसांपूर्वीच पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांचं निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. ठरलं तर मगच्या टीमलाही ज्योती ताई आपल्यातून निघून गेल्याचं दु:ख पचवणं आजही अवघड जातंय. पण शो मस्ट गो ऑन….गेले कित्येक दिवस पूर्णा आजी या पात्राला प्रेक्षक मिस करत होते. प्रेक्षकांच्या इच्छेखातर पूर्णा आजी पुन्हा आपल्या भेटीला येणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी पूर्णा आजीची भूमिका साकारणार आहेत.
पूर्णा आजी म्हणजेच रोहिणी ताई म्हणाल्या, ‘ठरलं तर मग’ मालिका माझी आवडती मालिका आहे आणि मी न चुकता पहाते. याच मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणार आहे. मनात संमिश्र भावना आहेत. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कुणीतरी साकारलेली भूमिका पुढे नेणार आहे. पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांच्यासोबत माझी जुनी मैत्री होती. कधी वाटलं नव्हतं ती अशी अचानक सोडून जाईल आणि तिची भूमिका मी साकारेन. कलाकाराने ती भूमिका एका पातळीवर नेऊन ठेवलेली असते. त्या कलाकाराने केलेलं काम पुढे न्यायचं थोडं जबाबदारीचं काम आहे. माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करणार आहे. प्रेक्षकांनी तितक्याच दिलदारपणे स्वीकारावं ही इच्छा आहे.’ पूर्णा आजीच्या एण्ट्रीने सेटवरही आनंदाचं वातावरण आहे. सगळ्या टीमने मिळून रोहिणी ताईंचं मनापासून स्वागत केलं आहे. या मालिकेचा आता नवा प्रोमोही आला आहे. यामुळे प्रेक्षकांना आनंद झालाय.

