नागपूर : नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या जलक्रांती परिषदेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे तसेच पाणीसंवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या देश-विदेशातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी “राजकारणात एक रुपयाचं काम आणि दहा रुपयांची प्रसिद्धी असा नियम आहे,” असे वक्तव्य केले. तसेच समस्या जितकी मोठी, तितकी काम करणाऱ्यांची संख्या कमी असते, असेही त्यांनी नमूद केले. मात्र, परिषदेत सर्वाधिक चर्चा झाली ती नाना पाटेकर यांच्या भाषणाची. ‘नाम फाऊंडेशन’च्या कार्याचा उल्लेख करताना त्यांनी आपल्या अभिनय प्रवासातील अनुभव शेअर केले. विशेषतः नटसम्राट या चित्रपटाविषयी बोलताना त्यांनी नाटकाऐवजी सिनेमा करण्यामागील कारण स्पष्ट केले.
नाना पाटेकर म्हणाले की, “अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका साकारणं हे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक आहे. प्रत्येक प्रयोगात पूर्ण जीव ओतावा लागतो. त्यामुळे मी नाटक करण्याऐवजी सिनेमा करण्याचा निर्णय घेतला. १०-१५ प्रयोगांनंतर मी कदाचित मेलो असतो.” त्यांनी पुढे डॉ.श्रीराम लागू, दत्ता भट्ट, चंद्रकांत गोखले आणि यशवंत दत्त यांसारख्या दिग्गज कलाकारांचा उल्लेख करत त्यांच्या अभिनयाची प्रशंसा केली. “या कलाकारांनी प्रत्येक प्रयोगात जीव ओतला. त्यांच्या अभिनयाची उंची गाठणं कठीण आहे,” असे ते म्हणाले. तसेच दिवंगत अभिनेते विक्रम गोखले हे अभिनयाच्या बाबतीत स्वतःपेक्षा कितीतरी श्रेष्ठ होते, असेही त्यांनी नमूद केले. ‘पुरुष’ नाटकाचा उल्लेख करताना त्यांनी प्रेक्षकांवर होणाऱ्या परिणामाचे वर्णन केले आणि “जो आनंद अभिनयातून मिळतो, तोच आनंद ‘नाम’चं काम करतानाही मिळतो,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

