मुंबई : मुंबई लोकल म्हणजे प्रचंड गर्दी, धावपळ आणि दररोजच्या प्रवासातील संघर्ष असे चित्र अनेकांच्या डोळ्यांसमोर उभे राहते. दररोज लाखो प्रवासी मध्य रेल्वेच्या लोकल सेवेवर अवलंबून असल्याने गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये चढणे आणि उतरणे हे मोठे आव्हान ठरते. या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारपासून मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार असून, त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या मध्य रेल्वे मार्गावर १५ डब्यांच्या एकूण २२ लोकल फेऱ्या चालवल्या जात आहेत. मात्र प्रवाशांची वाढती संख्या आणि गर्दीचे प्रभावी नियोजन लक्षात घेऊन या फेऱ्यांची संख्या वाढवून ३२ करण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या धावणाऱ्या काही १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांच्या लोकलमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. या बदलामुळे प्रत्येक लोकलमध्ये सुमारे २५ टक्के अधिक प्रवासी प्रवास करू शकतील. एका १५ डब्यांच्या लोकलमधून एकावेळी सुमारे ७,५०० हून अधिक प्रवाशांची वाहतूक शक्य होणार असल्याने गर्दीचा ताण कमी करण्यास मोठी मदत होईल, असा रेल्वे प्रशासनाचा विश्वास आहे.
या निर्णयाचा सर्वाधिक फायदा सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवास करणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी आणि नियमित प्रवाशांना होणार आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कल्याण, कसारा, कर्जत आणि खोपोली या प्रमुख मार्गांवर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मोठी धावपळ करावी लागते. १५ डब्यांच्या लोकलच्या वाढीव फेऱ्यांमुळे हा ताण काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय मध्य रेल्वेने केवळ लोकल फेऱ्या वाढवण्यावरच भर दिलेला नसून, विविध स्थानकांवरील फलाटांचा विस्तार करण्याचे कामही टप्प्याटप्प्याने सुरू केले आहे. फलाटांची लांबी वाढल्यानंतर भविष्यात आणखी १५ डब्यांच्या लोकल सुरू करणे शक्य होणार आहे. त्यामुळे आगामी काळात मध्य रेल्वेवरील प्रवाशांना अधिक सक्षम, सुरक्षित आणि सोयीस्कर उपनगरी रेल्वे सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

