मुंबई : आठवड्याभरावर आलेल्या दिवाळीमुळे मुंबईतील घराघरात सध्या जय्यत तयारी सुरू आहे. साफसफाई, फराळ, आकर्षक कंदील आणि पणत्यांची खरेदीही सुरू झाली आहे. मात्र, दिवाळी म्हटलं की सर्वांना आठवणारे फटाके फोडण्यापूर्वी मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) आता मुंबईच्या रस्त्यांवर फटाके विक्री करण्यावर बंदी घालण्याचा कडक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विनापरवाना होणाऱ्या फटाकेविक्रीवर पूर्णपणे ‘बॅन’ लावण्यात आला आहे. मुंबई शहराची सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी महानगरपालिकेने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे, फुलबाजी, भुईचक्र, अनार किंवा बॉम्बची खरेदी आता अधिकृत ठिकाणीच करावी लागणार आहे.
दिवाळी तोंडावर असताना मुंबई महानगरपालिकेने शहरातील रस्त्यांवर आणि पदपथांवर होणाऱ्या अवैध फटाकेविक्रीविरोधात आता कठोर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. शहरातील सुरक्षा आणि नियमांचे पालन व्हावे, यासाठी पालिकेने मोठे पाऊल उचलले आहे. अवैध आणि धोकादायक विक्री थांबवण्यासाठी पालिकेने १५ ऑक्टोबरपासून ते दिवाळी संपेपर्यंत दररोज विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. रस्त्यांवर फटाके विकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, एवढेच नव्हे तर त्यांचा मालही जप्त केला जाईल. या मोहिमेत पालिकेकडून विशिष्ट ठिकाणी विशेष लक्ष दिले जाईल. भुयारी मार्गात आवाज आणि धूर करणाऱ्या फटाकेविक्रेत्यांवर पालिकेचे विशेष लक्ष असणार आहे. केवळ अवैध विक्रेत्यांवरच नव्हे, तर अधिकृत विक्रेत्यांनाही त्यांच्या परवान्यातील मर्यादेपेक्षा अतिरिक्त साठा ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या वर्षी या कारवाईत २५० किलो फटाके जप्त करण्यात आले होते. या वर्षी अंधेरी, दादर आणि कुर्ला यांसारख्या भागांमध्ये सर्वाधिक अनधिकृत विक्री सुरू असल्याचे दिसून आले आहे. या भागांना चाप लावण्यासाठी कठोर कारवाईचे संकेत पालिकेने दिले आहेत.