सातारा प्रतिनिधी : सुट्टीवर घरी आलेले ‘इंडो तिबेट बॉर्डर’ पोलीस दलातील जवान विजय श्रीरंग सोनावणे, विरमाडे (वय ३७, ता. वाई) यांचे आनेवाडी टोलनाक्याजवळ अपघाती निधन झाले. गणपती विसर्जन मिरवणुकीनंतर विरमाडे येथून सातारा येथील घरी जात असताना हा अपघात झाला. विजय सोनावणे हे सध्या सुट्टीवर आले होते. साताऱ्यातील तामजाईनगर परिसरात ते आपल्या कुटुंबीयांसोबत वास्तव्यास होते. मंगळवारी ते आपल्या मूळ विरमाडे गावी विसर्जन मिरवणुकीसाठी गेले होते.
मिळालेल्या माहिती नुसार, महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यावर आले असता अंधारामुळे महामार्गावर उभा असलेला ट्रक त्यांच्या निदर्शनास न आल्याने त्यांची दुचाकी ट्रकला पाठीमागून जोरदार धडकली. या धडकेत बुलटेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच सोनावणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते महामार्गावर बेशुद्ध अवस्थेत पडले होते. अपघातानंतर तात्काळ अपघातस्थळी उपस्थित असलेल्या विरमाडे येथील तरुणांनी त्यांना सातारा येथील यशवंत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, जास्त रक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जवान विजय सोनावणे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन बहिणी असा परिवार आहे. गेल्या १७ वर्षांपासून ते देशसेवा करीत होते. जवानाच्या अपघाती निधनामुळे सातारा शहरात सर्वत्र शोककळा पसरली आहे,