वृत्तसंस्था : पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडल्याने निवडणूक आयोगाने पक्षाचे मूळ ‘जोरा फूल’ (फुले आणि गवत) हे निवडणूक चिन्ह गोठवले आहे. त्यानंतर आयोगाने दोन्ही गटांना स्वतंत्र नावे आणि तात्पुरती निवडणूक चिन्हे दिली आहेत. त्यानुसार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गटाला ‘ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ हे नाव आणि ‘फुटबॉलपटू’ हे चिन्ह देण्यात आले आहे. तर अरूप रॉय यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस’ हे नाव आणि ‘लिफाफा’ हे चिन्ह देण्यात आले आहे. पश्चिम बंगालमधील नंदीग्राम आणि रेझिनगर तसेच आसाममधील नागाव पोटनिवडणुकांमध्ये दोन्ही गटांकडून मूळ पक्षाच्या नावावर उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी आयोगाने हा निर्णय घेतला. ही व्यवस्था अंतरिम असून पक्षाचे मूळ नाव आणि चिन्हाबाबत अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित आहे.
दरम्यान, आयोगाच्या निर्णयावर ममता बॅनर्जी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत हा दिवस लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचे म्हटले. त्यांनी हा निर्णय पक्षपाती आणि असंवैधानिक असल्याचा आरोप केला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही निवडणूक आयोगावर टीका करत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता तृणमूल काँग्रेसचेही पक्षचिन्ह हिरावले गेल्याचा दावा केला. नंदीग्राममध्ये ममता गटाने काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर जुन्या हत्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली, यावरूनही राजकीय वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात २२ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार असून, या निकालाचा परिणाम शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेससह इतर पक्षांवरही होण्याची शक्यता असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.
