मुंबई : राज्यात कृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्री, दसरा, दिवाळीसह विविध धर्मीयांचे सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होणार आहेत. या काळात महाप्रसाद, भंडारा, अन्नदान, लंगर, इफ्तार मेजवानी आणि सामूहिक भोजन कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर अन्नवाटप केले जाते. सणासुदीच्या काळात मिठाई, खवा, पनीर, तूप, दूध, खाद्यतेल, बेसन, सुका मेवा यांसारख्या खाद्यपदार्थांची मागणी अचानक वाढत असल्याने भेसळ, निकृष्ट दर्जाचे अन्न आणि बनावट उत्पादनांचा धोका वाढतो. ही बाब लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कठोर पावले उचलली आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, राज्यभर वर्षभर साजऱ्या होणाऱ्या सर्व सण, यात्रा, उरूस आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी एक कायमस्वरूपी स्थायी आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशानुसार महाप्रसाद, भंडारा, लंगर, अन्नछत्र किंवा इफ्तारसारख्या सामूहिक अन्नवाटपाच्या कार्यक्रमासाठी आयोजकांना अन्न व औषध प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. कार्यक्रमासाठी अन्न तयार करणारा किंवा पुरविणारा केटरर “Caterer” या व्यवसाय प्रकाराखाली वैध परवानाधारक असणे बंधनकारक असून, कार्यक्रमाच्या किमान सात दिवस आधी संबंधित पदनिर्देशित अधिकाऱ्याला माहिती देणे आवश्यक असेल. तसेच अन्न सुरक्षा अधिकारी प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी भेट देऊन अन्न सुरक्षा आणि मानक कायद्याचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी करतील. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये आणि भेसळयुक्त अन्नामुळे विषबाधा किंवा इतर घटना घडू नयेत, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अन्न व्यवसाय चालकांसाठीही प्रशासनाने अनेक महत्त्वाचे नियम लागू केले आहेत. प्रत्येक व्यवसायाकडे वैध परवाना किंवा नोंदणी असणे आवश्यक असून तो परवाना “Food Safety Connect” ॲपच्या QR कोडसह ग्राहकांना दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित करावा लागणार आहे. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल केवळ परवानाधारक किंवा नोंदणीकृत पुरवठादारांकडूनच खरेदी करावा आणि त्याची बिले किमान एक वर्ष जतन करणे बंधनकारक राहील. परवानगी नसलेले खाद्यरंग, अखाद्य रसायने किंवा औद्योगिक रसायनांचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. वापरलेले खाद्यतेल अधिकृत RUCO संकलकांकडेच सुपूर्द करावे लागणार असून त्याचीही नोंद ठेवावी लागेल. अन्न हाताळणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे वार्षिक वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याशिवाय प्रत्येक २५ अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांमागे किमान एक FOSTaC प्रमाणित अन्न सुरक्षा पर्यवेक्षक नियुक्त करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आयोजक, केटरर्स किंवा अन्न व्यवसाय चालकांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे. सण-उत्सवांच्या काळात लाखो नागरिक महाप्रसाद, भंडारा आणि सामूहिक भोजनाचा लाभ घेत असल्याने त्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळावे, यासाठी ही संपूर्ण यंत्रणा अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.

