शिर्डी : साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज देश-विदेशातून हजारो भाविक शिर्डीत येत असतात. दर्शनानंतर साईबाबा संस्थानच्या वतीने प्रत्येक भाविकाला बुंदीचा प्रसाद दिला जातो. मात्र, अनेक भाविक श्रद्धेपोटी हा प्रसाद मंदिर परिसरातील भटक्या श्वानांना आणि इतर प्राण्यांना खाऊ घालतात. या कृतीमुळे प्राण्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे समोर आल्यानंतर श्री साईबाबा संस्थानने भाविकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले की, साईबाबांनी सर्व जीवांवर दया करण्याची शिकवण दिली असली तरी दयाभाव व्यक्त करताना त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. बुंदीसारख्या गोड आणि तेलकट प्रसादामुळे श्वानांना विविध आजारांचा धोका निर्माण होत असून त्यांना मधुमेह, लठ्ठपणा, त्वचारोग तसेच इतर आरोग्यविषयक समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे मंदिर परिसरात किंवा आजूबाजूला फिरणाऱ्या श्वानांना बुंदीचा प्रसाद अथवा कोणताही गोड पदार्थ देऊ नये, असे संस्थानने स्पष्ट केले आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी मंदिर परिसरात विविध ठिकाणी सूचना फलकही लावण्यात आले आहेत. तसेच सेवाभावी संस्था आणि स्वयंसेवकांच्या माध्यमातूनही भाविकांना प्राण्यांच्या योग्य आहाराबाबत माहिती दिली जात आहे. संस्थानच्या म्हणण्यानुसार, भटक्या प्राण्यांवर वेळोवेळी वैद्यकीय उपचार केले जात असले तरी चुकीच्या आहारामुळे निर्माण होणाऱ्या आजारांवर कायमस्वरूपी नियंत्रण ठेवण्यासाठी भाविकांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे श्रद्धा आणि दयाभाव कायम ठेवत प्राण्यांना त्यांच्या आरोग्यास अपायकारक ठरणारे पदार्थ देणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिर्डीतील पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सुशील कोळपे यांनीही या विषयावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मंदिर परिसरात येणारे अनेक भाविक प्रेमापोटी श्वान आणि मांजरांना बुंदी, पेढे किंवा इतर गोड पदार्थ खाऊ घालतात. मात्र, हे पदार्थ प्राण्यांच्या नैसर्गिक आहाराचा भाग नसल्याने त्याचा थेट आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. वारंवार गोड पदार्थ खाल्ल्यामुळे श्वानांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि त्यांना मधुमेहासारखे गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, त्वचारोग होणे, वजन झपाट्याने वाढणे, शारीरिक हालचाली कमी होणे आणि सुस्ती येणे अशा समस्या निर्माण होत आहेत. काही दिवसांपूर्वी मंदिर परिसरातील अनेक श्वानांना अशाच लक्षणांमुळे उपचारासाठी आणण्यात आले होते. रक्त तपासणी आणि वैद्यकीय परीक्षणानंतर त्यांच्यात मधुमेहाची लक्षणे आढळून आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यामुळे गोड पदार्थांऐवजी प्राण्यांसाठी योग्य आणि पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. साईबाबांच्या शिकवणीनुसार प्राण्यांवर प्रेम करणे म्हणजे त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेणे होय. त्यामुळे भाविकांनी बुंदीचा प्रसाद किंवा इतर गोड पदार्थ श्वानांना न देता तो स्वतः प्रसाद म्हणून ग्रहण करावा आणि प्राण्यांसाठी योग्य खाद्यपदार्थ उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन संस्थान आणि पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी संयुक्तपणे केले आहे. श्रद्धा, सेवा आणि संवेदनशीलता यांचा समतोल राखत प्राण्यांच्या आरोग्याचे संरक्षण करणे हीच साईबाबांना खरी आदरांजली ठरेल, असा संदेशही यानिमित्ताने देण्यात आला आहे.

