पिंपरी-चिंचवड : गोपाळकाला अर्थात दहीहंडी उत्सवाला अवघे १५ दिवस शिल्लक राहिले असून, पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी परिसरातील कुंभारवाड्यात सध्या हंड्या तयार करण्याची लगबग अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दहीहंडी उत्सवासाठी लागणाऱ्या पारंपरिक मातीच्या हंड्यांवर कारागिरांकडून शेवटचा हात फिरवला जात आहे. आकर्षक रंगरंगोटी, कलाकुसर आणि सजावटीचे काम पूर्ण करण्यात येत आहे. मात्र, सण जवळ आला असतानाही हंड्यांना अपेक्षित मागणी मिळत नसल्याने कुंभारवाड्यातील कारागीर आणि व्यावसायिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. यंदाच्या उत्सवासाठी सांगवीतील कारागिरांनी मोठी तयारी केली असून, जवळपास ४५० ते ५०० मातीच्या हंड्या तयार करून ठेवल्या आहेत. या हंड्या तयार करण्यासाठी माती मळणे, आकार देणे, उन्हात वाळवणे, भट्टीत भाजणे आणि त्यानंतर रंगकाम करणे, अशा अनेक टप्प्यांतून जावे लागते. प्रत्येक हंडीमागे कारागिरांचे अनेक तासांचे श्रम, कौशल्य आणि अनुभव असतो. मात्र, एवढी मेहनत करूनही ग्राहकांकडून अद्याप फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. गेल्या वर्षी दहीहंडी उत्सवाच्या महिनाभर आधीपासूनच मंडळे आणि शाळांकडून हंड्यांची मागणी सुरू झाली होती. त्यामुळे यंदाही चांगली विक्री होईल, अशी अपेक्षा कारागिरांनी व्यक्त केली होती. मात्र, सण जवळ येऊनही बुकिंग सुरू न झाल्याने तयार केलेल्या हंड्यांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
सध्या बाजारात विविध आकार आणि प्रकारच्या मातीच्या हंड्या उपलब्ध असून, त्यांची किंमत साधारण १०० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत आहे. उत्पादन खर्च वाढलेला असतानाही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी यंदा हंड्यांच्या किमतीत वाढ करण्यात आलेली नाही. मात्र, दर परवडणारे असूनही मागणी कमी असल्याने कारागिरांची चिंता वाढली आहे. माती, रंग, इंधन, वाहतूक यांसह इतर साहित्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचबरोबर हंडी तयार करण्यासाठी लागणारा वेळ आणि मेहनतही मोठी असते. तयार केलेल्या हंड्यांची विक्री झाली नाही तर गुंतवलेले भांडवल अडकून पडण्याची शक्यता आहे. एका कारागिराने सांगितले की, अनेक तास मेहनत घेऊन हंड्या तयार केल्या आहेत. गेल्या वर्षी सणाच्या आधीपासून ग्राहक येत होते, मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे. आता जो ग्राहक येईल, त्याला परवडेल त्या दरात हंडी विकण्याची वेळ आली आहे. निदान केलेला खर्च तरी परत मिळावा, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. दहीहंडी उत्सवात पारंपरिक मातीच्या हंड्यांना विशेष महत्त्व आहे. आधुनिक काळात विविध सजावटीच्या वस्तू आणि पर्याय उपलब्ध झाले असले तरी मातीची हंडी ही उत्सवाची पारंपरिक ओळख मानली जाते. त्यामुळे दहीहंडी मंडळांनी आणि नागरिकांनी स्थानिक कुंभारांकडून हंड्या खरेदी केल्यास या पारंपरिक व्यवसायाला मोठा आधार मिळेल, अशी अपेक्षा कारागिरांकडून व्यक्त केली जात आहे. सणाला आता काही दिवसच शिल्लक असल्याने पुढील काळात हंड्यांची विक्री वाढेल, अशी आशा कारागिरांना आहे. मात्र, तयार केलेल्या शेकडो हंड्यांना वेळेत ग्राहक मिळतील का आणि यंदाचा हंगाम अपेक्षेप्रमाणे जाईल का, हा प्रश्न सध्या सांगवीतील कुंभारवाड्यातील कारागिरांसमोर कायम आहे.
