मुंबई : मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान, सुलभ आणि अखंड करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल म्हणून महालक्ष्मी येथे देशातील पहिला ट्रॅव्हललेटरयुक्त (चालता रस्ता) पादचारी पूल उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. महालक्ष्मी मल्टिमॉडल कनेक्टिव्हिटी प्रकल्पांतर्गत साकारला जाणारा हा प्रकल्प सध्या सुमारे ९० टक्के पूर्ण झाला असून, त्याद्वारे संत गाडगे महाराज चौक मोनोरेल स्थानक, मेट्रो मार्गिका-३ आणि महालक्ष्मी उपनगरीय रेल्वे स्थानक यांना थेट जोडले जाणार आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना एका वाहतूक सेवेतून दुसऱ्या सेवेत जाण्यासाठी होणारी धावपळ कमी होणार असून, दररोजच्या प्रवासातील सुमारे २० मिनिटांचा वेळ वाचणार आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या स्थानकांदरम्यान पायी चालत किंवा रस्ता ओलांडत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या प्रकल्पामुळे अधिक सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार आहे. विशेषतः दक्षिण मुंबई, महालक्ष्मी आणि वरळी परिसरातून मोनोरेल, मेट्रो आणि लोकल रेल्वेपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होणार असल्याने प्रवाशांचा वेळ, श्रम आणि प्रवासातील अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होतील. या मल्टिमॉडल कनेक्टिव्हिटीमुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढण्यास मदत होईल, तसेच खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी झाल्याने रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या आणि अत्यंत वर्दळीच्या महालक्ष्मी परिसरात हा प्रकल्प उभारणे हे मोठे अभियांत्रिकी आव्हान होते. मात्र, बांधकामादरम्यान स्थानिक नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची विशेष काळजी घेण्यात आली. यासाठी १,८०० मिमी व्यासाची पाणी वाहिनी सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आली, तसेच इतर तांत्रिक कामेही नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आली. या प्रकल्पाद्वारे केवळ महालक्ष्मी परिसरातच नव्हे, तर संपूर्ण मुंबईत विविध सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमध्ये सुलभ इंटरचेंज सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. त्याचाच भाग म्हणून मेट्रो मार्गिका-२बीवरील चेंबूर स्थानकाला जवळच्या मोनोरेल स्थानकाशीही थेट जोडण्याचे काम सुरू आहे. संत गाडगे महाराज चौक हे चेंबूरला जोडणाऱ्या सुमारे २० किलोमीटर लांबीच्या मोनोरेल मार्गाचे अंतिम स्थानक असून, सध्या तांत्रिक कारणांमुळे बंद असलेली मोनोरेल सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर आणि महालक्ष्मीतील ट्रॅव्हललेटरयुक्त स्कायवॉक कार्यान्वित झाल्यानंतर मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास अधिक आरामदायी, सुरक्षित आणि वेगवान होणार आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या विविध माध्यमांना अखंडपणे जोडणारा हा प्रकल्प मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, भविष्यातील आधुनिक आणि प्रवाशाकेंद्रित शहर वाहतूक व्यवस्थेसाठी तो एक आदर्श ठरणार आहे.

