नाशिक : नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या काळात दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांना वेळेत आरोग्य सेवा मिळावी यासाठी आरोग्य विभाग सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. विशेषतः पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या आदिवासी आणि डोंगराळ भागातील गरोदर महिलांची सुरक्षित प्रसूती सुनिश्चित करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने ‘माहेरघर’ ही संकल्पना गेल्या पाच वर्षांपासून यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला असून घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अशा परिस्थितीत अनेक गावांचा बाहेरील भागाशी संपर्क तुटण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य विभागाने विशेष नियोजन केले आहे. सध्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचओहोळ आणि पेठ तालुक्यातील जोगमोडी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हा उपक्रम प्रभावीपणे सुरू असून, आता जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही तो राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अतिवृष्टीमुळे रस्ते बंद होणे, पूरस्थिती निर्माण होणे किंवा दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन ज्या गरोदर महिलांची प्रसूती जवळ आली आहे, अशा महिलांची स्वतंत्र यादी आरोग्य विभागाकडून तयार केली जाते. संभाव्य अडचणींचा विचार करून त्यांना प्रसूतीच्या नियोजित तारखेपूर्वीच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात दाखल केले जाते. तेथे त्यांची वैद्यकीय तपासणी करून प्रसूतीदरम्यान कोणताही धोका आहे का, याचे मूल्यांकन केले जाते. जोखीम असलेल्या गर्भवतींवर विशेष लक्ष ठेवले जात असून, आवश्यक असल्यास त्यांना उच्चस्तरीय रुग्णालयातही पाठविण्याची व्यवस्था केली जाते. या उपक्रमामुळे माता आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यास मोठी मदत होत असून, दुर्गम भागातील महिलांना वेळेत उपचार मिळत असल्याने सुरक्षित प्रसूतीची शक्यता वाढत आहे.
माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्यात दरड कोसळणे, पूर येणे, जमीन खचणे किंवा आंदोलनांमुळे रस्ते बंद होणे अशा विविध कारणांमुळे गर्भवती महिलांना वेळेत रुग्णालयात पोहोचविणे कठीण होते. अशा वेळी ‘माहेरघर’ उपक्रम अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना प्रसूतीपूर्वीच आरोग्य केंद्रात दाखल केले जाते, त्यामुळे अचानक प्रसूतीवेदना सुरू झाल्यास कोणताही धोका निर्माण होत नाही. महिलांना दवाखान्यात आणण्यासाठी आणि प्रसूतीनंतर सुरक्षितपणे घरी पोहोचविण्यासाठी सरकारी रुग्णवाहिकेची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली जाते. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर गर्भवती महिलांना आवश्यक औषधोपचार, नियमित तपासण्या, पौष्टिक आहार आणि इतर वैद्यकीय सुविधा पूर्णपणे मोफत दिल्या जातात. विशेष म्हणजे, महिलेसोबत आलेल्या एका नातेवाईकाच्या राहण्याची आणि जेवणाचीही व्यवस्था केली जाते. जर संबंधित महिलेचे पहिले अपत्य असेल, तर त्या बालकाचीही आवश्यक काळजी घेतली जाते. त्यामुळे गर्भवती महिलांवरील मानसिक ताण कमी होण्यास मदत होते. पावसाळ्यात दुर्गम भागातील गरोदर महिलांची सुरक्षित प्रसूती सुनिश्चित करण्यासाठी आरोग्य विभागाचा हा उपक्रम प्रभावी ठरत असून, यंदाही संपूर्ण जिल्ह्यात तो अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याची तयारी करण्यात आली आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा आणि प्रसूती जवळ आलेल्या महिलांनी आरोग्य विभागाशी वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

