पालघर : गेल्या २४ तासांपासून पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये झाडे आणि वीज खांब कोसळल्याने शेकडो गावांचा मागील १६ तासांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून रेल्वे सेवेचाही खोळंबा झाला आहे. डहाणू आणि तलासरी तालुक्यांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून डहाणू शहराला चारही बाजूंनी पाण्याचा वेढा पडला आहे. इराणी रोड, चंद्रिका हॉटेल परिसर, सागर लॉज आणि डहाणू बस डेपो परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. तलासरी आणि कासा परिसरातील सखल भागांतील घरांमध्येही पाणी घुसल्याने नागरिकांची धावपळ उडाली आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्याचा इतर भागांशी संपर्क विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, गुजरात आणि पालघर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे घोलवड आणि उंबरगाव दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई–गुजरात मार्गावरील १० लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. डहाणूहून पनवेलकडे जाणारी मेमू ट्रेन सुमारे एक तास उशिराने नालासोपारा स्थानकात पोहोचली, तर चर्चगेटकडे जाणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्या ५ ते १० मिनिटे विलंबाने धावत आहेत. बोईसर–पालघर मार्गावरील सरावली येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने हा मुख्य मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, सततच्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जारी केला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

