मुंबई : साकीनाका येथील खैरानी मार्गावर उघड्या मॅनहोलमध्ये पडून असलम इसाक शेख यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर मुंबई महापौर रितू तावडे यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी राजावाडी रुग्णालयात जाऊन मृताच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी शेख कुटुंबीयांना तातडीने दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत महापौरांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे तसेच संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. भविष्यात अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येणार नाही, यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महापौर रितू तावडे यांनी सांगितले की, पावसाळ्यापूर्व तयारीच्या बैठकीत शहरातील सर्व मॅनहोलची झाकणे सुरक्षित आणि व्यवस्थित बसविण्याबरोबरच धोकादायक झाडांचे सर्वेक्षण, फांद्यांची छाटणी आणि आवश्यक त्या संरक्षक उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. त्यांनी स्वतः, उपमहापौर, इतर पदाधिकारी, महापालिका आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध बैठका घेऊन या सूचनांची वारंवार आठवण करून दिली होती. नालेसफाई, रस्त्यांचे सिमेंटीकरण आणि इतर विकासकामांच्या पाहणीदरम्यानही नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले होते. मुसळधार पावसाचा इशारा असताना खैरानी मार्गावरील मॅनहोल उघडे ठेवण्याचे कोणतेही कारण नव्हते आणि तेथे आवश्यक सुरक्षा व्यवस्था न करणे ही गंभीर निष्काळजीपणा असल्याचे त्यांनी नमूद केले. सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या कामांदरम्यान नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. उघड्या मॅनहोलमुळे एका निष्पाप नागरिकाचा मृत्यू होणे अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असून, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाकडून कठोर उपाययोजना करण्यात येतील, असे महापौरांनी स्पष्ट केले.
