अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ऐतिहासिक आणि निसर्गरम्य श्री मलंगगडावर दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. काही महिन्यांपूर्वी गडावर जाण्यासाठी बहुप्रतिक्षित दोरमार्गावरील डबा सेवा सुरू झाल्याने प्रवास अधिक सोयीचा झाला असला, तरी मोठ्या संख्येने भाविक आजही पायी मार्गाने गड चढण्यास प्राधान्य देतात. या पार्श्वभूमीवर राज्य पर्यटन विभागाने अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या गडावरील पायऱ्यांच्या नूतनीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तीन टप्प्यांत जवळपास पाच कोटी रुपयांच्या निधीतून गडावरील साडेतीन हजार पायऱ्यांचे मजबुतीकरण आणि पुनर्बांधणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याशिवाय उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी आणखी चार कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्तावही शासनाकडे सादर करण्यात आला आहे. अनेक वर्षांच्या वापरामुळे मलंगगडवाडीपासून गडाच्या माथ्यापर्यंत जाणाऱ्या या पायऱ्या तुटलेल्या, खचलेल्या आणि अत्यंत धोकादायक बनल्या होत्या. त्यामुळे गडावर वास्तव्यास असलेले नागरिक, लहान-मोठे व्यावसायिक तसेच पायी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसाठी हा प्रवास अधिक कष्टदायक ठरत होता. त्यामुळे या मार्गाचे नूतनीकरण करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि भाविकांकडून सातत्याने केली जात होती.
विशेषतः पावसाळ्यात निसरड्या आणि तुटलेल्या पायऱ्यांमुळे अपघातांचा धोका अधिक वाढत होता. अनेक ठिकाणी पायऱ्यांची अवस्था अत्यंत खराब झाल्याने भाविकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. ही गंभीर बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाने पुढाकार घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून दगडी पायऱ्यांच्या पुनर्बांधणीचे काम सुरू केले. या प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी खर्च केला जात असून, आतापर्यंत सुमारे सत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामांसाठी आणखी चार कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी प्रस्तावित करण्यात आला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत मानकर यांनी दिली. पुढील काही महिन्यांत संपूर्ण पायऱ्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर गडावर जाणारा पायी मार्ग अधिक मजबूत, सुरक्षित आणि सुकर होणार आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी, गडावरील व्यावसायिक तसेच दरवर्षी मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार असून, श्री मलंगगडावरील धार्मिक पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

