वृत्तसंस्था : आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज भारत आणि बांगलादेश महिला संघ आमनेसामने येणार असून हा सामना भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणे आवश्यक आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघावर विजयाचे दडपण वाढले असून या सामन्याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने स्पर्धेची सुरुवात चांगली केली होती, मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवामुळे उपांत्य फेरीचा मार्ग कठीण झाला आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धचा सामना भारतासाठी अत्यंत निर्णायक मानला जात आहे. भारतीय संघाच्या फलंदाजीची जबाबदारी स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष यांच्यावर असेल. जेमिमा रॉड्रिग्जकडूनही मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. गोलंदाजीत दीप्ती शर्मा, रेणुका सिंह आणि राधा यादव यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. विशेष म्हणजे दीप्ती शर्मा महिला टी-२० विश्वचषकातील महत्त्वाच्या गोलंदाजी विक्रमाच्या उंबरठ्यावर असून तिच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असेल.
दुसरीकडे, बांगलादेश संघही आत्मविश्वासाने मैदानात उतरणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या विजयामुळे संघाचे मनोबल उंचावले आहे. कर्णधार निगार सुलताना, रितू मोनी आणि शोर्ना अख्तर या खेळाडू बांगलादेशसाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे भारताला हा सामना हलक्यात घेता येणार नाही. दोन्ही संघांमधील टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या इतिहासावर नजर टाकली तर भारताचे वर्चस्व स्पष्ट दिसून येते. आतापर्यंत झालेल्या २३ सामन्यांपैकी भारताने २० सामने जिंकले आहेत, तर बांगलादेशला केवळ ३ विजय मिळाले आहेत. विश्वचषक स्पर्धेतही भारताने बांगलादेशविरुद्धचे सर्व सामने जिंकले आहेत. त्यामुळे आकडेवारी भारताच्या बाजूने असली तरी स्पर्धेतील दडपण आणि बांगलादेशचा वाढलेला आत्मविश्वास लक्षात घेता सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे. ओल्ड ट्रॅफर्डची खेळपट्टी साधारणपणे संतुलित मानली जाते. सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते, तर फलंदाज एकदा स्थिरावल्यानंतर धावगती वाढवू शकतात. सामन्यादरम्यान वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता असली तरी पावसाचा धोका कमी असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे चाहत्यांना संपूर्ण सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हा सामना भारतात दूरचित्रवाणीवर थेट पाहता येणार असून डिजिटल माध्यमांवरही थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल.
सामन्यासाठी दोन्ही संघ :
भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, भारती फुलमाली, दीप्ति शर्मा, ऋचा घोष, श्री चरणी, यास्तिका भाटिया, नंदनी शर्मा, अरुंधति रेड्डी, रेणुका सिंह, क्रांति गौंड आणि राधा यादव.
बांगलादेश : जुआरिया फिरदौस, दिलारा अख्तर, शर्मिन अख्तर, निगार सुल्ताना (कर्णधार/विकेटकीपर), सोभाना मोस्तारी, शोर्ना अख्तर, रितु मोनी, नाहिदा अख्तर, राबेया खान, शंजिदा अख्तर मेघला आणि मारुफा अख्तर.

