मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्याच्या समस्या दरवर्षी उद्भवत असतात. या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने पुढील दोन वर्षांसाठी व्यापक नियोजन केले असून शहरातील विविध भागांमध्ये पाणी उपशासाठी ५४७ पंप बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमासाठी सुमारे १४२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. मागील वर्षी शहरातील विविध ठिकाणी ४८१ पंप भाडेतत्त्वावर बसविण्यात आले होते. मात्र यंदा पंपांच्या संख्येत ६६ ने वाढ करण्यात आली असून त्यामुळे साचलेल्या पावसाच्या पाण्याचा जलद निचरा करण्यास मदत होणार आहे. मुंबईच्या भौगोलिक रचनेमुळे अनेक सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साचते आणि त्याचा निचरा होण्यास विलंब होतो. परिणामी काही भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होते आणि वाहतूक तसेच जनजीवन विस्कळीत होते. ही समस्या लक्षात घेऊन गेल्या सोळा वर्षांपासून महानगरपालिका पावसाळ्यात साचलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी विशेष पंपांची व्यवस्था करत आहे. या पंपांच्या मदतीने साचलेले पाणी जवळील नाले, मलनिस्सारण वाहिन्या आणि पर्जन्यजल वाहिन्यांमध्ये सोडले जाते, ज्यामुळे पाणी साचण्याचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.
मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय प्रभागांमध्ये तसेच राजे एडवर्ड आणि लोकमान्य टिळक या प्रमुख रुग्णालयांच्या परिसरातही हे पंप बसविले जाणार आहेत. सन २०२६ आणि २०२७ या कालावधीसाठी पंप बसविण्याची योजना आखण्यात आली असून त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येणार आहे. पंपांच्या कार्यावर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी प्रत्येक पंपावर विशेष उपकरणे बसविण्यात येणार आहेत. या उपकरणांच्या माध्यमातून पंप सुरू किंवा बंद असल्याची माहिती थेट महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण प्रणालीपर्यंत पोहोचणार आहे. याशिवाय पंप कार्यरत असलेल्या ठिकाणी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या भ्रमणध्वनींवर विशेष स्थाननिश्चिती व्यवस्था लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित कर्मचारी प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित आहेत की नाही, याची माहिती थेट विशेष प्रणालीद्वारे उपलब्ध होईल. या व्यवस्थेमुळे पंपांच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमतेची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी महानगरपालिकेचा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम ठरणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
